प्रभाग कार्यालयात भाजपाने उघडले नागरी समस्यांचे गाठोडे

माजिवडे प्रभाग समिती अपयशी असल्याचा आमदार संजय केळकर यांचा आरोप.

ठाणे : मागील दीड वर्ष प्रशासकीय राजवट असून या काळात नागरी समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. माजिवडे – मानपाडा प्रभाग समिती याबाबत अपयशी ठरल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला.
माजिवडे – मानपाडा प्रभाग समितीमध्ये सोमवारी आमदार संजय केळकर यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शौचालयापासून स्मशानभूमी आणि अतिक्रमणापासून सेवा रस्त्यापर्यंत सर्व नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याची बाब केळकर यांनी अधिकाऱ्यांच्या  निदर्शनास आणून दिली. आमदारांसोबत भाजपचे पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, मंडल अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी नागरिकांच्या स्थानिक समस्या घेऊन आले होते. या सर्व समस्यांचा पाढा केळकर यांनी अधिकाऱ्यांसमोर वाचला.
एकीकडे रंगरंगोटीसाठी १०० कोटींहून जास्त निधी खर्च होत असताना दुसरीकडे मात्र नागरी समस्या सोडवण्यात प्रभाग समितीला अपयश आले आहे. एक डझनहून जास्त शौचालयांची दुरवस्था झाली आहे. तीच अवस्था स्मशानभूमीची आहे. समितीच्या हद्दीत बॅनरबाजीला ऊत आला असून कारवाईबाबतही दुटप्पी भूमिका प्रशासन घेत आहे. सेवा रस्त्यांवर अतिक्रमणेही वाढली आहेत. अनधिकृत बांधकामांचा प्रश्नही गंभीर आहे. मागील दीड वर्षे आणि त्या आधीपासून विविध सुविधांबाबत पाठपुरावा होऊनही त्या सोडवण्यात प्रभाग समितीला अपयश आल्याचा आरोप करत या समस्या प्राधान्याने म सोडवल्यास भाजप रस्त्यावर उतरेल,असा इशाराही केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिला.
बैठकीत उपायुक्त तायडे, सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील, कार्यकारी अभियंता, तर भाजप पदाधिकारी हेमंत म्हात्रे, सुरज दळवी, अलकेश कदम, दत्ता घाडगे, तन्मय भोईर, मत्स्यगंधा पवार, अमित पाटील, निलेश चव्हाण आदी उपस्थित होते.
*बंद उद्यान सुरू होणार*
ढोकाळी येथील नंदीबाबा मंदिराजवळील उद्यान अनेक दिवसांपासून बंद असल्याने स्थानिकांना त्याचा लाभ घेता येत नव्हता. आमदार संजय केळकर यांनी सूचना केल्यानंतर हे उद्यान तातडीने खुले करण्यात येईल, असे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले.

 11,853 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.