पाणीटंचाईमुळे ठाणेकर भागवतात ‘टँकर’वर तहान

पाणीटंचाईमुळे ठाणेकर
भागवतात ‘टँकर’वर तहान

  • आमदार संजय केळकर यांचे ठोस उपाययोजनेसाठी साकडे
  • पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

ठाणे: घोडबंदर परिसरातील काही गृहसंकुले पाणी टंचाईमुळे टँकरपोटी वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. ठाणेकरांची ही समस्या गंभीर झाली असून त्यावर कृती आराखडा देखील तयार झाला आहे. आमदार संजय केळकर यांनी उपमुख्यमंत्री पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देत तातडीने या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित १०२व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, ठाण्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. याबाबतच्या तक्रारी घेऊन अनेक गृहसंकुलातील पदाधिकारी उपस्थित होते. लोढा अमारा गृहसंकुल, प्लॅटिनम हेरिटेज टँकरपोटी प्रत्येकी ८५ लाख रुपये खर्च करत आहेत. हावरे सिटीमधील इमारती २० लाख रुपये खर्च करत आहेत. हिरानंदानी इस्टेट, कॉसमॉस क्लासिक धर्मवीरनगर या भागासह उर्वरित ठाण्यातही हीच परिस्थिती आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र आजही समस्या गंभीर असून तीन तीन दिवस टँकर मिळत नसल्याची बाब श्री. केळकर यांनी उघडकीस आणली आहे. या समस्येवर तातडीने संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदें यांच्याकडे केल्याची माहिती श्री. केळकर यांनी दिली.

कार्यक्रमात फेरीवाल्यांनी त्रस्त रहिवासी देखिल तक्रार घेऊन उपस्थित होते. याबाबत बोलताना श्री. केळकर म्हणाले, ग्लॅडी अल्वारीस मार्ग परिसराला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. महापालिका मुख्यालयाभोवतीच फेरीवाले ठाण मांडून आहेत. लोक उपवन इमारतीभोवती टांगे, फेरीवाले रहिवाशांचे रस्ते अडवून उभे आहेत. यावर ठोस कारवाई होत नसल्याने करदात्या नागरिकांना हक्काच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. अधिकारी कारवाई करणार नसतील तर भाजपची टीम रस्त्यावर उतरतील, त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही श्री. केळकर यांनी दिला.

 3,203 total views,  83 views today