१९ दिवसात कोरोनाला हरविले
ठाणे : देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. देशात ६० वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत, मात्र, मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणाऱ्या एक ९८ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली असून ते पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. वृद्ध व्यक्तीच कोरोनाचे जास्त शिकार ठरतात, हा संशोधकांचा अहवाल पुन्हा एकदा खोटा ठरला आहे. बोरिवली इथे राहणारे ९८ वर्षीय मधुसुदन भंडारी यांना सर्दी पडसे झाले होते तसेच थोडा खोकलाही होता त्यामुळे त्यांना २० जुलैला बोरोवली येथील अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्यावर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता. ९८ वर्षीय आजोबा हे कोरोना संक्रमणाआधी म्हणजेच मार्च महिन्यापूर्वी एकदम तंदुरुस्त होते; न चुकता रोजचा घरातल्या घरात वॉक,संतुलित आहार व वाचन असा त्यांचा नित्यक्रम होता. अपेक्स हॉस्पिटलमध्ये १९ दिवस राहून ९८ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी मुंबईत वयाची शंभरी पूर्ण करणार्या एका कोरोनाबाधित वृद्ध व्यक्तीवर यशस्वी उपचार केल्यानंतर, घरी पाठविण्यात आले होते. कोरोनापासून आपण वाचू शकतो, गरज आहे फक्त निर्धाराची व कोरोनाला न घाबरता सामोरे जाण्याची, हाच संदेश या आजोबांनी आपल्या इच्छाशक्तीतून दिला आहे अशी माहिती अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे चेस्ट फिजिशियन डॉ जिग्नेश पटेल यांनी दिली. भारतात ६०-६५ आणि त्यापुढच्या वयोगटातील नागरिकांचे कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. *वयाची नव्वदी ओलांडलेल्या व्यक्तीने कोरोनावर मात करणे, हे सकारात्मक संकेत असून कोरोनाग्रस्तांसाठी एक आशेचा किरण आहे. कोरोना विषाणू म्हणजे वृद्धांसाठी फक्त मृत्यू नाही, या केसने आम्हाला आत्मविश्वास दिला आहे असे मत अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ संदीप सिंग यांनी व्यक्त केले.घरी जाताना श्री भंडारी यांनी अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्सेस व पॅरा मेडिकल स्टाफ यांचे आभार मानले. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व गुजरात येथील नव्वदीपार झालेले कोरोनाग्रस्त नागरिक पूर्णपणे बरे होत असून भारताच्या वैद्यकीय क्षेत्राला ही बाब नक्कीच दिलासादायक देणारी आहे.
369 total views, 2 views today