नेपाळ-भूतान सदिच्छा दौऱ्यात महाराष्ट्राकडून सहभाग
ठाणे : ठाण्याचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कवीश्वर कोळी यांचे ४ऑगस्ट रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी ते ६९वर्षाचे होते. त्यांच्या पाश्चात पत्नी अलका, मुलगा व मुली असा परिवार आहे. ठाण्याच्या नवरत्न मंडळाकडून खेळणारा कवीश्वर, जे. के. रेमण्ड या व्यवसायिक संघाकडून खेळत असे. उजवा कोपरारक्षक म्हणून कामगिरी करताना तो ब्लॉक उत्तम प्रकारे करीत असे. कमी उंची असल्याचा त्याला ब्लॉक करताना फायदा होत असे. कविश्वरने ब्लॉक केला की, बलदंड शरीराच्या खेळाडूंना देखील हालचाल करता येत नसे. याकामी त्याला डावा कोपरारक्षक हरेश्वर कोळी याची चांगली साथ लाभत असे. ठाण्याकडून तो १०वर्ष राज्य स्पर्धेत खेळला. महाराष्ट्राकडून तो एकच राष्ट्रीय स्पर्धा खेळला. पण नेपाळ-भूतान सदिच्छा दौरा करण्याची मात्र त्याला महाराष्ट्राकडून संधी मिळाली. अशा या गुणी खेळाडूचा अंत्यसंस्कार सायंकाळी मनीषा नगर, कळवा येथील हिंदू स्मशान भूमीत करण्यात आला. कोरोनाच्या साथीमुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत मुलाने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
365 total views, 1 views today