रस्ताच चोरीला गेल्याचा नागरीकांचा आरोप : जागेच्या मालका विरोधात गुन्हा दाखल
बदलापूर : बदलापूर गावातील पालिकेचा एका रस्ता अचानक गायब झाला आहे. आमचा ८० वर्षा पूर्वीचा रस्ता चोरीस गेला असून आम्हाला शोधून द्या अशी मागणी या भागातील नागिकांनी करत आहेत. ८० वर्षे जुना असलेला रस्ता तातडीने तयार करून द्यावा अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी आम्ही उपोषण करू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. मालकीची जमीन असल्याने विना परवाना रस्ता केल्याने त्यातील रस्ता उखडून टाकल्याचे जमीन मालकांचे म्हणणे आहे. पालिकेने मात्र जमीन मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आज हातात चप्पल घेऊन चिखलातुन कसा बसा मार्ग काढत जाणाऱ्या या महिला आणि त्यांच्या सोबत त्यांची लहान मुले. तीन महिन्या पूर्वी याच ठिकाणी असलेल्या डांबरी रस्त्यावरून हे सर्व ये जा करत होत्या. आपल्या रोजच्या पाया खालचा रस्ताच अचानक गायब झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांना धक्काच बसला. या सर्वाना येण्या जाण्या साठी आता रस्ताच राहिला नसल्याने ऐन पावसाळ्यात त्यांच्या दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
बदलापूर गावातील वार्ड क्रमांक तीन मधील पाण्याच्या टाकीच्या बाजूने जाणारा हा रस्ता या भागातील शेतकरी आणि ४० ते ५० कुटुंबा साठी प्रमुख दळण वळणाचा मार्ग होता. मात्र या रस्त्याचा २०० मीटरचा भाग एका खाजगी जमीन मालकाने जे सी बीच्या साहाय्याने अक्षरश: उखडून टाकला आहे. आता या रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. एवढेच नाही तर एका ठिकाणी चर खणून आहे तो मार्गहि बंद केला आहे. आधीच शहरात कोविड सारख्या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव असतांना रिक्षा, एबुलन्स सोडा साधी दुचाकी सुद्धा येथे येऊ शकत नाहीये. त्यामुळे ८० वर्षा पासूनच हा जुना रस्ता पालिकेने लवकरात लवकर बनवून द्यावा. याबाबत आम्ही मुख्याधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आदी अधिकाऱ्यांकडे रीतसर निवेदन देऊन हि बाब निदर्शनास आणून दिली आहे. मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. येत्या १५ ऑगस्ट पर्यंत हा रस्ता पूर्ववत करण्यात आला नाही तर आम्ही उपोषण करू असा इशारा या नागिकांनी दिला आहे.
मुळात हा नागरिकांसाठी रस्ता नाही, केवळ शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी ये जा करण्यासाठी वाट करून दिली होती. आजही शेतकऱ्यांना अडचण करत नाही. पालिकेने ती जागा आमच्याकडून घेतलेली नाही कि सातबारावर तसा शिक्का नाही. पालिकेने आमच्या कडून कायदेशीर परवानगी मागितली तर रस्ता तयार करायला आमची कोणतीही हरकत नाही अशी भूमिका जागेचे मालक नंदकुमार भोपी यांची आहे.
अनेक वर्षांपासून रस्ता आहे. पालिकेने तिकडे डांबरीकरण करून दिले आहे. जमीन मालकाने रस्ता उखडल्याबद्दल बदलापूर पालिकेने जमीन मालका विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रस्ता उखडून पालिकेचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल त्याला नोटीस बजावली आहे. तसेच त्याच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचे आदेश दिले असल्याचे पालिकेचे मुख्यधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितले
ऐन पावसाळ्यात अश्या प्रकारे रास्ता बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना वेठीस न धरता जागा मालक आणि पालिका यांनी वेळीच यावर तोडगा काढून रास्ता सुस्थितीत करायची गरज आहे.
383 total views, 1 views today