जनजागृती समितीचे मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे प्रतिपादन
‘ऑनलाइन’ माध्यमातून नवव्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला उत्साही वातावरणात प्रारंभ
ठाणे : कोरोना महामारी असो कि भविष्यात उभे ठाकलेले तिसरे विश्वयुद्ध असो, कालमहिम्यानुसार येणारा काळ हा हिंदुत्वनिष्ठांना अनुकूल असा काळ असणार आहे. त्यासाठी आपल्याला हिंदु राष्ट्राची मागणी सातत्याने करत रहायला हवी. कोरोना महामारीच्या काळात तबलिगी जमातने ‘कोरोना वाहका’ची भूमिका निभावली, तर अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘कोरोना योद्ध्यां’ची भूमिका निभावली. सध्याच्या काळात राजकारण, शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे, कलाक्षेत्र आदी सर्वच क्षेत्रांत ‘देशभक्त आणि धर्मप्रेमी’ विरुद्ध ‘देशद्रोही आणि धर्मविरोधी’ असे ध्रुवीकरण होत आहे. या वैचारिक ध्रुवीकरणाच्या काळात धर्माची बाजू घेत हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते ‘नवव्याअखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
हे अधिवेशन ३० जुलै ते २ ऑगस्ट आणि ६ ते ९ ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत ‘ऑनलाईन’ होत आहे. या अधिवेशनात देश-विदेशांतून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, विचारवंत, संपादक, उद्योगपती आदी मोठ्या संख्येने ‘ऑनलाईन’ उपस्थित होते. समितीच्या ‘यू ट्यूब’ चॅनल आणि फेसबूकद्वारे हे अधिवेशन ६७ हजारांहून अधिक लोकांनी प्रत्यक्ष पाहिले, तर ३ लाख १७ हजारांहून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोचला. हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या समर्थनार्थ अनेकांनी ट्वीट केल्या. #We_Want_Hindu_Rashtra हा हॅशटॅग भारतात पहिल्या पाचमध्ये ट्रेंडींगमध्ये होता. या अधिवेशनाचे समितीच्या HinduJagruti या यु ट्यूब चॅनेलद्वारे, तसेच HinduAdhiveshan या फेसबूक पेजवर लाईव्ह प्रसारण होत आहे.
अधिवेशनाचा प्रारंभ हा शंखनाद, वेदमंत्रांचे पठण आणि डॉ.चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. अधिवेशनाचा उद्देश सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी या वेळी सांगितला, तर सूत्रसंचालन सुमित सागवेकर यांनी केले.
‘निधर्मी आणि विदेशी लोकांच्या कुदृष्टीमुळे नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सध्याचे नेपाळ शासन हे हिंदुद्रोही आहे. नेपाळ आणि भारत ही दोन्ही राष्ट्रे ‘हिंदु राष्ट्र’ होण्यासाठी विश्वभरातील हिंदूंनी संघटित होऊन आपले योगदान द्यावे. छोटे, सांप्रदायिक स्वार्थ सोडून व्यापक हिंदुत्वाचा आग्रह धरला पाहिजे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय धर्मसभा, नेपाळचे अध्यक्ष डॉ. माधव भट्टराई यांनी केले.
बाली (इंडोनेशिया) येथून ऑनलाइन माध्यमातून जोडलेले आणि ‘इंटरनॅशनल डिवाइन लव्ह सोसायटी’चे अध्यक्ष, तसेच ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’चे उपाध्यक्ष धर्मयेशाजी म्हणाले, ‘परिवारातील लोकांचे जसे आपण रक्षण करतो, तसेच आपण धर्माचे रक्षण केले पाहिजे. धर्म हा मोक्षदायी आहे. त्यामुळे एका सेवकाप्रमाणे धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले रक्षण करील.’ कर्नाटक येथील श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक म्हणाले, ‘कोरोनासारख्या अजून काही विषाणूंचे संकट आपल्यासमोर आहे, ते म्हणजे हिंदुविरोधी नि हिंदुद्रोही ! सर्व राष्ट्रविघातक शक्तींना उत्तर म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ हेच होय.’
437 total views, 1 views today