भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा पालिका, राज्य सरकारला सवाल
मुंबई : नीती आयोग आणि मुंबई पालिकेच्या ३ वाँर्डातील अँटीबॉडी सर्वेक्षणात झोपडपट्टीत ५७% तर इमारतीमध्ये १६% जणांना कोरोना होऊन गेल्याचे उघड. तर खाजगी लँबच्या सर्वेत सुमारे २५% लोकांना कोरोना होऊन गेलाय?म्हणजे ४०% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले? यात तुम्ही काय करुन दाखवले? असा थेट सवाल भाजपा नेते, माजी शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी पालिका, राज्य सरकारला केला आहे.
नीती आयोग आणि खुद्द महापालिकेनं अलीकडेच महापालिकेच्या तीन प्रभागांमध्ये अँटीबॉडी टेस्ट केल्या. त्यानुसार, झोपडपट्टीतील ५७ टक्के तर, इमारतींमधील १६ टक्के रहिवाशांना करोना होऊन गेल्याचं समोर आलं आहे. तर थायरोकेअर लॅबने केलेल्या अँटीबॉडी चाचण्यांमध्ये वरळीत ३२.१५%, घाटकोपरला ३६.७%, सांताक्रुजला ३१.४५% तर बांद्रा पश्चिमेला १७% जणांना कोरोना इन्फेक्शन होऊन गेल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. याचा सरळ अर्थ असा आहे की, सुमारे ४० टक्के मुंबईकरांना करोना होऊन गेला आहे. त्यांनी स्वबळावर त्यावर मात केली आहे. मग राज्य सरकार आणि महापालिकेनं केलं काय,’ असा सवाल शेलार यांनी केला आहे.
‘मुंबई महापालिका व राज्य सरकारने केलेले दावे साफ खोटे आहेत. झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक शौचालयांचं निर्जंतुकीकरण केलं नाही. तसेच इमारतींचं सॅनिटायझेशन केलं नाही. लोकप्रतिनिधी निर्जंतुकीकरण करीत असताना पालिकेने सांगितले की, पालिकेशिवाय अन्य कोणी निर्जंतुकीकरणाची फवारणी करु नये. त्यानंतर अग्निशमन दला मार्फत केवळ एकदा फवारणी केली. त्यानंतर याकडे लक्ष दिले नाही. एप्रिल, मे, जून या कालावधीत चाचण्या अधिक होण्याची गरज होती,त्यावेळी चाचण्यांची संख्या वाढवली नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होतच राहीला ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होती, किंवा जे मुंबईकर त्यासाठी आवश्यक उपाययोजना करीत होते, त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवली नाहीत. त्यांनी स्वबळावर कोरोनावर मात केली. दोन्ही सर्वेक्षणात हे दिसून आले असून मुंबई महापालिकेने किमान १ लाख मुंबईकरांची अँडीबॉडी टेस्ट कराव्यात ज्यातून सत्य परिस्थिती समोर येईल अशी मागणीही भाजपाने केली आहे. आमदार अँड आशिष शेलार यांनी २१ जुलैला याबाबत पालिका आयुक्तांना याबाबत पत्र ही लिहिले होते. तशा चाचण्या ही पालिका करायला तयार नाही मग ‘करून दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी नेमकं काय केलं,’ अशी विचारणा शेलार यांनी केली आहे. चाचण्यांची संख्या जेव्हा आवश्यक होती तेव्हा वाढवली नाही.आता चाचण्या वाढवून कोरोना होऊन गेला सांगताय..? यात तुम्ही काय करुन दाखवले? असा सवाल करीत त्यांनी अजूनही १ लाख अँटीबॉडी चाचण्या करा… सत्य समोर येईल , असे ही म्हटले आहे.
487 total views, 1 views today