नवे तंत्रज्ञान व्यवहार्य आहे का?

संगणक पुरवून परिक्षा घेण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा सल्ला

मुंबई : करोनामुळे उदभवलेल्या परिस्थ‍ितीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांनी अध्ययन तसेच अध्यापनासाठी आधुनिक डिजिटल नव साधनांचा स्वीकार करावा असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी करत दुसऱ्याबाजूला मात्र आयआयटी सारख्या संस्थांनी देखील ऑनलाईन अध्यापनाचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र नवे तंत्रज्ञान सुसंवादी, प्रमाणित आणि व्यवहार्य आहे का ? याचा देखील साकल्याने विचार करणे आवश्यक असल्याचे परस्पर विरोधी मत त्यांनी व्यक्त करत पुन्हा एकदा संगणक पुरवून विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेता येणे शक्य असल्याची भूमिका मांडत परिक्षा घेण्याच्या मतावर ते ठाम असल्याचे त्यांनी दाखवून दिले.
अकादमीस्थान फाऊंडेशन या उच्चशिक्षण संस्थांमधील शिक्षकांसाठी ऑनलाईन व्यासपीठाचे कार्य करणाऱ्या संस्थेने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन अध्यापनाकरिता नव-युगातील साधने‘ या विषयावरील चर्चासत्राचे (वेबिनार) राजभवन येथून उदघाटन करताना राज्यपाल बोलत होते.
परिक्षा न देता विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यांना स्वत:ला खचितच समाधान लाभणार नाही असे नमूद करून आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर करुन परिक्षा घेणे व त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक नाही त्यांना संगणक पुरवून परिक्षा घेणे शक्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कालप्रवाहानुसार अनेक गोष्टी बदलत असतात. परंतु अध्यापनात काही गोष्टी शाश्वत असतात, असे सांगून नवतंत्रज्ञान स्वीकारताना शिक्षणातील शाश्वत मूल्ये जपली पाहिजेत. लहान मुलांच्या नेत्र आरोग्याचा विचार करून लहान्यांच्या अध्यापनासाठी ऑनलाइन साधने खरोखरीच उपयुक्त आहेत का याचा विचार होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
‘ऑनलाईन अध्यापन साधने व त्यांचे उपयोग‘, ‘उत्तम शैक्षणिक सामग्रीची निर्मिती‘विद्यार्थी सुसवांद व सहअध्ययन‘ या विषयावरील या तीन दिवसांच्या कार्यशाळेला देशभरातून ६००० शिक्षक सहभागी होत असल्याची माहिती अकादमीस्थान फाऊंडेशनचे संस्थापक व मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीवरील कुलपतींचे सदस्य दिपक कुमार मुकादम यांनी दिली. चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्याला विविध विद्यापीठांचे कुलगुरु, प्रकुलगुरू व शिक्षक उपस्थित होते.

 492 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.