आमदार आशिष शेलार यांच्या तक्रारीनंतर फि वाढ न करण्याचे सर्व शाळांना आदेश
मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक व्यवहार बंद आहेत. त्यामुळे अनेक शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. तरीही मुंबईसह राज्यातील अनेक शाळांनी परस्पर फि वाढविण्यास सुरुवात केल्याची तक्रार माजी शिक्षण मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी विद्यमान शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे २९ एप्रिल २०२० रोजी करत निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तब्बल १० दिवसानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने या फि वाढीला मनाई करणारा आदेश काढत शाळांना बजाविला.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र त्यावेळी शाळांच्या शेवटच्या सत्राच्या परिक्षा, राहीलेली फि आदी गोष्टी होणार होत्या. सदर लॉकडाऊनची मुदत १४ एप्रिल रोजी संपणार होती. त्यावेळी अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची राहीलेली फि भरण्यासाठी पालकांच्या मागे तगादा लागला. तसेच पुढील शैक्षणिक वर्षाची फि ही वाढवित ही वाढीव फि ही भरण्यास पालकांच्या सांगितले. यासंदर्भात काही पालकांनी आशिष शेलार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर यासंदर्भात त्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली. तसेच अशा शाळांना फि वाढ करण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकारने आदेश काढावा अशी मागणी केली.
त्यावर अखेर सुरुवातीला शाळांना फि भरण्यासाठी पालकांमागे तगादा लावू नये असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिक्षण मंत्री गायकवाड यांनी केले. मात्र तरीही शाळांनी फि वसुली आणि फि वाढ दोन्ही तशीच सुरु ठेवली. त्यानंतर अखेर आज ९ मे रोजी यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने आदेश काढत लॉकडाऊन संपल्यानंतर पालकांकडून फि जमा करावी आणि फि वाढ २०२०-२१ यावर्षासाठी करू नये अशी सूचना केली.
479 total views, 1 views today