तरच १५ एप्रिलनंतर लॉकडाऊन टप्याटप्याने शिथिल करा

मुख्यमंत्र्यासमवेतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग चर्चेत पंतप्रधानांची सूचना

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संर्व राज्यांनी लॉकडाऊन केले. तर केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केले. या लॉकडाऊनची मुदत १५ एप्रिल २०२० रोजी संपत असली तरी त्या त्या राज्यातील परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन एकदम न उठवता ती टप्याटप्याने शिथिल करावी अशी सूचना करत राज्यातीळ स्थितीनुसार टप्य्याटप्य्याने याचे नियोजन करावे व कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाल्याचे समजून लोक रस्त्यावर येतील असे न होऊ देण्याची सूचना पंतप्रधानांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना केली.

३ लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, भोजन

परराज्यातील श्रमिक, कामगार यांच्यासाठी राज्य सरकार पुरेपूर काळजी घेता असून ३ हजार निवारा केंद्रांतून ३ लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, दोन वेळचे भोजन देत असल्याची माहिती यावेळी दिली. त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठीही यातील तज्ञ , डॉक्टर नियुक्त केल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिली. तसेच परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना देखील आपण आहे तिथेच राहा, तुमची काळजी घेतली जाईल असे सांगितल्याची त्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले.

मोठ्या प्रमाणात आयसोलेशनसाठी तयारी

पुढील परिस्थितीच्या नियोजनाचा भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी आरोग्य कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच सुरु केले आहे. महानगरपालिकेच्या ४ वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिंग मधून एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आम्ही विशेष कक्षासाठी तयार करीत आहोत. नव्या प्रोटोकॉलप्रमाणे ( मानकाप्रमाणे ) आम्ही लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींचे देखील रुग्णालयाबाहेर विलगीकरण करीत असून त्यासाठी  पालिका अधिकारी आणि पोलिसांच्या देखरेखीखाली लॉजेस, क्लब्स, मंगल कार्यालये, ताब्यात घेतले आहेत. पुढे गरज पडल्यास तयारी असावी म्हणून  एखादी मोठी जागा निश्चित करून याठिकाणी आयसोलेशन व क्वारंटाईन सुविधा उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

आमचे पूर्ण लक्ष आम्ही कोरोनाचा प्रसार थांबविण्यावर केंद्रित केले असून पूर्वी चाचणी कमी होत असल्याने रुग्णांची संख्या कमी होती, त्या तुलनेत आता खासगी प्रयोगशाळांना देखील चाचणीची परवानगी दिल्याने आणि त्यांचे दोन तीन दिवसांचे निदान एकदम एकत्रितरीत्या हाती येत असल्याने रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे असे चित्र दिसते. मात्र या रुग्णांना  रुग्णालयांत  दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबई शहरातील महानगरपालिका रुग्णालयात आयसोलेशनसाठी केवळ २८ रुग्णशय्या होत्या त्यामध्ये आता २१००  पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

कोविड रुग्णालय

सध्या एकट्या सेव्हन हिल रुग्णालयात १५००खाटांची सोय फक्त कोविड १९ साठी निर्माण करण्यात आली असून येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या  निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे येथेही कोविड रुग्णालय उभारत आहोत असेही ते या कॉन्फरन्समध्ये म्हणाले.

वैद्यकीय उपकरण उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे

पीपीई किट्स, एन ९५ मास्क, इतर वैद्यकीय उपकरणांची तर गरज आहेच. स्थानिक पातळीवर काही आवश्यक उपकरणे तयार करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांचे उत्पादन प्रमाणित करून मिळाल्यास आपण स्वतःची क्षमता निर्माण करू शकतो असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 1,364 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.