वाशी वॉरियर्स संघाची विजयी सलामी

जयदीप परदेशी आणि प्रसाद पवारने दुसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.

ठाणे : वाशी वॉरीयर्स संघाने कल्याण टस्कर्स संघाचा सहा विकेट्सनी पराभव करत माझगाव क्रिकेट क्लब आयोजित नवी मुंबई प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. ७१ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या प्रसाद पवारला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या कल्याण टस्कर्स संघाला जपजित रंधवाच्या अर्धशतकी खेळीमुळे समाधानकारक धावसंख्या रचता आली. एकीकडे सर्व फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरत असताना जपजितच्या ७३ धावांमुळे कल्याण टस्कर्सला १४४ धावापर्यंत मजल मारता आली. हर्ष मोगविराने १९ धावा केल्या. अतुल सिंगने ४१ धावांत ३, गजेंद्र बोहराने २५ धावांत २ आणि ऋषीकेश पवारने एक विकेट मिळवली.
उत्तरादाखल सलामीला आलेल्या जयदीप परदेशी आणि प्रसाद पवारने दुसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. त्याआधी जयदीपने सलामीचा दुसरा सहकारी ऋषीकेश पवारच्या साथीने पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी रचत संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली होती. वाशी वॉरियर्स संघाने चार विकेट्सच्या मोबदल्यात १८ व्या षटकात १४४ धावा करत लीगमध्ये विजयी शुभारंभ केला. प्रसादने ७१, जयदीपने ४०, ऋषिकेशने १७ धावांचे योगदान दिले. कल्याण टस्कर्सकडून जावेद खानने दोन, आदित्य धुमाळ आणि रौनक शर्माने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
संक्षिप्त धावफलक : कल्याण टस्कर्स : २० षटकात ९ बाद १४३ (जपजित रंधवा ७३, हर्ष मोगविरा १९, अतुल सिंग ४-४१-२, गजेंद्र बोहरा ४-२५-२, ऋषीकेश पवार ४-२१-१) पराभूत विरुद्ध वाशी वॉरीयर्स : १८ षटकात ४ बाद १४४ (प्रसाद पवार ७१, जयदीप परदेशी ४०, ऋषिकेश पवार १७, जावेद खान ४-२३-२, आदित्य धुमाळ ४-३१-१, रौनक शर्मा ३-३१-१). सामनावीर- प्रसाद पवार.

 18,513 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.