महाराष्ट्रात दूध भेसळीमुळे आरोग्याला बाधा

दूधभेसळीमुळे महिलांना स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका
मुंबई :  या जानेवारी महिन्यात  मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोईसर परिसरातील बिहारी टेकडी सोसायटीत एका घरात भेसळयुक्त दुधाचा कारखाना सीपी नियंत्रण गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला आहे. या कारखान्यातून १०४० लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. जगातील  कोणत्याही देशामध्ये जो आवडीने व विश्वासाने पिणाऱ्या पेयांमध्ये दुधाचा सर्वात वरचा नंबर लागतो असे असले तरीही भारतामध्ये पांढर्‍या दुधातील भेसळबाजीला कोणतीही यंत्रणा लगाम लावू शकली नाही. दुधाच्या सेवनाने व्यक्तीला वेगवेगळी प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कॅल्शियम, अनेक प्रकारची जीवनसत्त्वे मिळतात. मात्र, आजकालच्या दुधातून लोकांच्या शरीरात वेगवेगळी रसायने, डिटर्जंट पावडर, शाम्पू, सिंथेटिक पदार्थ असे बरेच काही जाऊन लोकांच्या आरोग्याला जीवघेणा धोका निर्माण झालेला आहे. दुधाची भेसळ व त्याचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी सांगताना अपेक्स हॉस्पिटल समूहाच्या पोषणतज्ञ सल्लागार आणि क्लिनिकल आहारतज्ञ मृणाली द्विवेदी सांगतात ,” दूध अधिक वेळ ताजे राहण्यासाठी अनेक वेळा त्यात सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम हायड्रॉक्साईड मिसळले जाते. ऑक्स्टोसीन औषधांचे दुष्परिणाम जनावरांबरोबरच माणसांवरही होत असतात. ज्यादा दुधाच्या आशेने ऑक्सीटोसीन औषधे दुभत्या जनावरांना दिली जातात. मात्र, त्यामुळे जनावरांना कॅन्सरचा धोका असतो. तसेच अशा दुधाच्या सेवनामुळे  मुलांना कावीळ तसेच मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो. पुरुषांमधील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. स्त्रियांना गर्भाशय आणि स्तनाचा रोग संभवतो. दुधाची घनता वाढविण्यासाठी त्यात युरिया, मालरोटेक्स, ग्लुकोज, मक्याचा स्ट्रार्च, साबुदाणे किंवा दुधाची भुकटी, लॅक्टो असे घटक मिसळले जातात. हे घटक वापरल्यामुळे दुधात दुप्पट पाणी मिसळूनही घनतेवर परिणाम होत नाही परंतु यामुळे आपली किडनी व पोटातील आतड्यांवर विपरीत परिणाम होतो.”
निसर्गाचे, प्राणिमात्रांचे समतोल देखिल बिघडत चालले आहे.आपली मनुष्य प्रजाती सुद्धा अशा भेसळयुक्त अन्न सेवांमुळे नक्कीच प्रभावित होत आहे याविषयी अधिक माहिती देताना मुलुंड येथिल प्लॅटिनम हॉस्पिटलचे  एमडी इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. समीर कनाकिया म्हणाले, ” दूध किंवा अन्य पदार्थांमधील भेसळ शोधून काढणे हे काही खूप कठीण काम नाही. आयटीचा योग्य वापर करून आपण चांगली सेन्सर्स, यंत्रे निर्माण करू शकतो. आयटी क्षेत्रामध्ये तेवढी क्षमता नक्कीच आहे की अशा सेन्सर्सद्वारे आपण घरीच दूध किंवा अन्य पदार्थांमधील भेसळ शोधून काढू शकतो. परदेशात अशी सेन्सर्स व यंत्रणा अगदी सहजपणे उपलब्ध होतात. आपल्याकडील द्राक्षे, केळी, आंबे, डाळिंबे आदी फळांची कमी किंवा बंद झालेली निर्यात हा सुद्धा एक चिंतेचा विषय आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारी कीटकनाशकांची फवारणी. अशी फळे मनुष्यांसाठी खाण्या योग्यच राहत नाही, दूध तर खूप लांबची गोष्ट आहे. आपण सर्वांनी मिळून ही भेसळ रोखली पाहिजे आणि ह्याकामी टेक्नोलॉजीचा वापर करणे ही काळाची गरज आहे.”

 21,838 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.