उस्मानाबाद, पुणे, ठाणे, मुंबई, सांगली बाद फेरीत

४८ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खोखो स्पर्धा, रायगड

रोहा रायगड : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८ वी कुमार – कुमारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत मुलींमध्ये पुणे, ठाणे, सांगली यांनी तर कुमार गटात उस्मानाबाद, पुणे ठाणे, मुंबई उपनगर, सांगली यांनी बाद फेरीत प्रवेश केला.
धाटाव (ता. रोहा) येथील नथुराम (भाऊ) पाटील क्रीडानगरीत, परमपुज्य पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालय आणि एम. बी. मोरे फाऊंडेशन महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर सुरु असलेल्या सामन्यात मुली गटात रत्नागिरीने साताऱ्यावर २४-१३ अशी एक डाव २ गुणांनी मात केली. रत्नागिरीतर्फे पायल पवार (३.३० मि; २ मि. संरक्षण व २ गुण), श्रेया सनगरे (२.५० मि; ३ मि. संरक्षण व २ गुण ), आर्या डोर्लेकर (२ गुण ) यांनी तर सातार्‍या तर्फे गीतांजली जाधव (१:४० मि. संरक्षण ) यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या एका सामन्यात पुण्याने धुळ्याचा २८-७ असा २१ गुणांनी धुव्वा उडवला. पुण्याच्या मानसी हरगणे (२.३० मि. संरक्षण ), प्रेरणा कांबळे (३.३० मि.संरक्षण ), दिपाली राठोड (४ गुण ) असा खेळ केला. तर धुळ्याच्या हंसिका पाटील (१.४० मि. १.३० मि. संरक्षण व २ गुण ) हिने एकतर्फी लढत दिली. तिसऱ्या सामन्यात ठाण्याने जालनाचा २३-३ असा २० गुणांनी पराभव केला. ठाण्यातर्फे प्रीती हलगरे (२:३० मि. संरक्षण ), सान्वी तळवडेकर (२:३० मि. संरक्षण, १ गुण ), कल्याणी कंक (७ गुण ) असा खेळ केला. पराभूत जालनातर्फे श्रद्धा चांदने (१ मि. संरक्षण ) चांगला खेळ केला. उर्वरित काही सामन्यात अहमदनगरने औरंगाबादचा २ मी. आणि ७:२० मि. राखून तर सांगली ने मुंबई उपनगरचा १५-४ असा एक डाव ११ गुणाने पराभव केला.
कुमार गटातील साखळी सामन्यात उस्मानाबादने धुळ्यावर एक डाव ४ गुण राखून मात केली. उस्मानाबादतर्फे भरतसिंग वसावे (२.१० मि. संरक्षण, ३ गुण ), सचिन पवार (२ मि. संरक्षण, २ गुण ) यांनी तर धुळ्यातर्फे जयेश फुलपागरे (१ गुण ) यांनी चांगला खेळ केला.
दुसऱ्या सामन्यात ठाणे संघाने परभणीचा १२-९ असा १ डाव ३ गुणांनी पराभव केला. त्यात राज संकपाळ (३.३० मि. संरक्षण, १ गुण ), सुरज मोरे (३.२० मि. संरक्षण ) असा खेळ करत विजय मिळवला. परभणीतर्फे नितीन खाटिंग (१.४० मि. संरक्षण व १ गुण ) ने चांगला खेळ केला. तिसऱ्या सामन्यात पुण्याने मुंबईचा १७-१६ असा ६:३० मिनिटे राखून १ गुण गुणाने पराभव केला. पुण्याकडून विवेक ब्राहमाने (२.२० मि. १.४० मि. संरक्षण व ३ गुण ), आकाश गायकवाड (१ मी., १ मी., व ५ गुण ) असा खेळ करत विजयात मोलाची कामगिरी केली. पराभूत मुंबई तर्फे जनार्दन सावंत (१.२० मि. संरक्षण व ३ गुण ), रोहित केदारे ( १ मि., १ मि. व ४ गुण ) यांनी चांगली लढत दिली.
उर्वरित सामन्यात सांगलीने रायगडचा १८-९ असा पराभव केला. मुंबई उपनगरने नंदुरबारचा एक डाव ९ गुण (२०-११) असा, सोलापूरने नाशिकचा १३-१२ असा ५.२० मिनिटे राखून १ गुणाने पराभूत केले.
लाल मातीतील खो-खो खेळाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. रोहा येथे होत असलेल्या या राज्य स्पर्धेतील दोन्ही सर्वोत्कृष्ट खेळाडूंना इलेक्ट्रिकल दुचाकी देऊन गौरव करू असे उद्योजक पुनित बालन यांनी उदघाटन प्रसंगी जाहीर केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघानी माघारी जाताना ही स्पर्धा आठवणीत ठेवतील अशा उत्कृष्ट सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत असे पुनीत बालन यांनी सांगितले. बालन हे अल्टीमेट खो-खो स्पर्धेतील मुंबई खिलाडी या संघांचे मालक आहेत.

 172 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.