गटई कामगारांनी केला संविधानाचा जागर
ठाणे : संविधान दिनाचे औचित्य साधून गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानक परिसरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो लोकांनी प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. दरम्यान, ‘डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार तरुण पिढीमध्ये पोहचविण्यासाठी उच्च दर्जाचे ग्रंथालय आणि अभ्यासिका ठाणे महानगर पालिकेने सुरु करावी, असे आवाहन यावेळी अशोक वैती यांनी केले.
७३ वा भारतीय संविधान दिन ठाणे शहरात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संविधान दिनाचे औचित्य साधून ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुशोभिकरण केले होते. या मेणबत्ती प्रज्वलित करुन भैय्यासाहेब इंदिसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. तर, माजी सभागृह नेते अशोक वैती, परिवहन समिती सभापती विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, संजय हेरवाडे, उपायुक्त खोडके, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, शंकर पाटोळे , अजय ऐडके यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी भैय्यासाहेब इंदिसे यांनी, आपल्या गुरूने म्हणजेच राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी ३९५ व्या खोलीत पहिली शाळा सुरू केली म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी ३९५ कलमांचे संविधान दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसात लिहिले आहे. किंबहुना, त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आज आपला देश एकसंघ राहिला आहे. त्यांचे हे उपकार देश कधीच फेडू शकणार नाही, असे सांगितले. अशोक वैती यांनी यावेळी, एक दिवस संविधान दिन साजरा करुन चालणार नाही. तर, बाबासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व समावेशक ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरु करण्याची कार्यवाही पालिकेने सुरु करावी, अशी मागणी केली. परिवहन समिती सभापती विलास जोशी यांनी, डॉ. बाबासाहेबांमुळे सामाजिक समता प्रदान करणारे संविधान या देशात लागू झाले आहे. किंबहुना, त्यांच्यामुळेच हा देश एकसंघ आहे, असे सांगितले. महेश आहेर यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा देताना बाबासाहेबांच्या विचारांचा जाग करण्याचे आवाहन केले.
तर, राजाभाऊ चव्हाण यांनी सांगितले की, बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध समाजाचेच आहेत, असा अपप्रचार मनुवाद्यांनी केला आहे. पण, बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच सर्व जाती धर्मांना एका सूत्तात बांधता आले आहे. त्यांचे हे उपकार कधीच उतराई होण्यासारखे नाहीत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलिराम मंडराइ, कैलास लोंगरे, राजू मालवी, सुभाष अहिरे, संतोष अहिरे, हिरालाल राठी, गोपाल विश्वकर्मा, पप्पू चितोले, हिरामण अहिरे, गौरव अहिरे, भावेश चव्हाण, हर्षद चव्हाण, मनिषा चव्हाण, जगदीश सोनटक्के आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
7,764 total views, 1 views today