५ जुलै रोजी साजरा करणार लोकशाही दिन

ठाणे  – सोमवार दि.५ जुलै २०२१  रोजी दुपारी १ वाजता समिती सभागृह पहिला मजला,नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय,ठाणे येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे.

कोविड-१९ या साथरोगाच्या आपत्तीमुळे सदर रोगाचा संसर्ग न होण्याच्या दृष्टीकोनातून जनहितार्थ Social Distancing चे पालन करणेबाबत सूचना दिल्याने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले नाही. तथापि लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आल्याने  शासनाने  परिपत्रकाद्वारे लोकशाही दिन आयोजित करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

लोकशाही दिनाचे आयोजन परिस्थितीनुरूप व शक्य असल्यास दूरचित्रवाणी परिषदेद्वारे (Video Conferencing) अथवा अर्जदारांच्या संमतीने Google Meet, Zoom App इ. अॅपचा वापर करुन करता येईल. तसेच ज्या ठिकाणी कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी व अर्जदारांना कार्यालयात बोलाविणे शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यानंतर अर्जदारांना छोटया संख्येच्या गटात समक्ष बोलावून लोकशाही दिनाचे आयोजन करणेबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत.

सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी त्यांची तक्रार विहित नमुन्यात तीन प्रतीत १५ दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथील नोंदणी शाखेमध्ये पाठविणे आवश्यक आहे. अर्जदार यांची तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाची असणे आवश्यक आहे. लोकशाही दिनामध्ये तक्रार करणेपूर्वी अर्जदाराने प्रथम संबंधित कार्यालयाकडे तसेच त्यांचे वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी. संबंधित कार्यालयाकडे/वरिष्ठ कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीच्या प्रती लोकशाही दिनी सादर करावयाच्या अर्जा सोबत जोडाव्यात. तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येण्याची आवश्यकता नाही. एका तक्रारी अर्जात एकच तक्रार असावी, एकापेक्षा अनेक तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रारदाराने प्रथम तालुका लोकशाही दिनामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. तालुका लोकशाही दिनामध्ये अर्ज केला नसल्यास, सदरहु अर्ज जिल्हा लोकशाही दिनामध्ये स्विकारला जाणार नाही. प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित असल्यास अर्ज थेट स्विकारण्यांत येतील.

लोकशाही दिनांत खालील बाबीशी संबंधी अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

न्याय प्रविष्ठ प्रकरणे, राजस्व अपिल, सेवा विषयक आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्या सोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले,अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज,तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या/लोकप्रतिनिधीच्या/संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज स्विकारला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

लोकशाहीदिनामध्ये अर्ज करतेवेळी आपण कोणत्या माध्यमातून (Video Conferencing, Google Meet, Zoom App) अथवा समक्ष लोकशाही दिनामध्ये सहभागी होणार आहात हयाबाबत अर्जामध्ये स्पष्टपणे उल्लेख करावा. तसेच अर्जामध्ये स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर अंतर्भूत करावा जेणेकरून आपणांस लोकशाही दिनामध्ये माध्यमाद्वारे उपस्थित राहता येईल.असे आवाहन  ठाणे उप जिल्हाधिकारी(सा.प्र.)बाळासाहेब वाकचौरे यांनी केले आहे.

 261 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.