ठाण्यात ठेकेदार आणि पालिका अधिकार्यांमुळेच महामारी पसरणार शमीम खान यांचा दावा
ठाणे – लोकांना दाखविण्यासाठी नालेसफाईची धुळफेक केली जात आहे. नाल्यांमधील गाळ रस्त्यावरच फेकण्यात आला आहे. अशा स्थितीमध्ये ठाणे शहरात महामारी पसरण्याचा धोका मोठा आहे. अन् अशी महामारी पसरली तर त्यास ठेकेदार आणि पालिका अधिकारीच जबाबदार असतील, असा दावा परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी केला आहे.
शमीम खान यांनी या संदर्भात आयुक्त, महापौर, विरोधी पक्षनेते यांना निवेदन दिले आहे.
ठाणे शहरात सध्या नालेसफाई केली जात आहे. मात्र, नाल्यातून काढलेला गाळ आणि कचरा तत्काळ उचलण्यात येत नाही. हा गाळ नाल्याच्या किनार्यावर तसेच रस्त्यावर टाकण्यात येत आहे. त्यावर डासांची पैदास होत आहे. परिणामी, एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता टायफॉईड, मलेरिया आदी आजारची उचल घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी तकलादू नालेसफाई करणारे ठेकेदार आणि त्यांना पाठिशी घालणारे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही शमीम खान यांनी केली आहे.
दरम्यान, मुंब्रा-कौसा भागात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार सयद अली अश्रफ भाईसाहब आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण, गटनेते, नजिब मुल्ला, संघर्ष महिला अध्यक्ष ऋता जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा- मुंब्रा विधानसभाक्षेत्रातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते महामारी पसरु नये, यासाठी काम करीत आहेत. त्यांच्यापासून काही धडा अधिकारी वर्गाने घ्यावा, असा टोलाही शमीम खान यांनी लगावला आहे.
415 total views, 1 views today