आगामी निवडणुकीत युतीच्या शक्यतेची चर्चा, पत्रीपूल येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौकाचे लोकार्पण, नगरसेविका रेखा राजन चौधरी यांची संकल्पना
कल्याण : कल्याणमध्ये भाजप नेत्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अचानक एण्ट्री करत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तसंच या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी केलेलं एक वक्तवही चर्चेचा विषय ठरत आहे. आता सोशल डिस्टन्स असला तरी आपल्या एकमेकांमधील डिस्टन्स वाढलं नाही पाहिजे असे वक्तव्य खासदार शिंदे यांनी भाजपच्या कार्यक्रमात केले असल्याने आता एकच चर्चा रंगू लागली आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये हे युतीचे संकेत तर नाही ना? असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित झाला आहे.
प्रभाग क्रमांक ४५ येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ९० फुटी कचोरे समांतर रस्ताच्या सुरवातीला चौकात भाजपा महिला जिल्हा अध्यक्षा, स्थानिक नगरसेविका रेखा राजन चौधरी यांच्या नगरसेवक निधीतून शिक्षणाचे प्रतीक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या चौकाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला डोंबिवली भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग भोसले, रिपब्लिकन पार्टी जिल्हा अध्यक्ष धर्मा वक्ते, आरपीआय शहराध्यक्ष संजय जाधव, कल्याण पूर्व मंडळ सचिव संतोष चौधरी, वार्ड अध्यक्ष भास्कर चौधरी, वार्ड अध्यक्षा सुनिता ढेरे, उत्तर भारतीय मोर्चा वार्ड अध्यक्ष लालजी दुबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम ठिकाणाच्या परिसरातूनच खासदार श्रीकांत शिंदे हे जात होते. या कार्यक्रमाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपली गाडी थांबवित कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली. भाजपच्या या कार्यक्रमामध्ये खरे तर खासदार शिंदे यांना निमंत्रण नव्हते, मात्र तरीही तेथून न थांबता निघून जाणं त्यांना योग्य वाटले नसल्याचं सांगत ते या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी स्थानिक नागरिकांना आणि भाजप कार्यकर्त्यांना संबोधताना आता कितीही सोशल डिस्टन्स असला तरी आपल्या एकमेकांच्या मनामधील डिस्टन्स वाढलं नाही पाहिजे असे वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केले. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणूकीत शिवसेना आणि भाजपमध्ये परत युती होते का? अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेले अनेक वर्षे शिवसेना भाजपची सत्ता आहे. मागच्या निवडणुकीध्ये सेना भाजप हे भले एकमेकांविरोधात लढले असले तरी निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा एकत्र येत महापालिकेवर युतीचा झेंडा फडकवला. गेल्या वर्षभरापासून चित्र बदललेले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मात्र येणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्रित लढणार का हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
466 total views, 1 views today