पवार म्हणाले, मुंडे-शर्मा प्रकरणाची स्वतंत्र चौकशी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या सदर्भात आणखी तक्रार समोर आल्यानंतर याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. पोलीस योग्य काम करतील असा विश्वास आहे. पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, पण आम्ही तपासात एसीपी दर्जाची माहिला अधिकारी असावी असं सुचवलं आहे. पोलिसांनी सर्वांशी चर्चा करुन वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करावा असे महत्वपूर्ण वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आज केले.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपावरून निर्माण झालेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने शरद पवारांच्या वक्तव्याला महत्व आले आहे.
दरम्यान गुरुवारी केलेल्या वक्तव्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, काल बोललो तेव्हा हे सर्व मला माहिती नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार करणं याची नोंद गांभीर्याने घेतली पाहिजे या भावनेने मी गंभीर शब्द वापरुन भूमिका घेतली. आता अधिक खोलात जाऊन वास्तव पुढे आणण्याची गरज आहे. कोणत्याही निर्णयावर येणं हा एखाद्यावर अन्याय करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही तपासातून येणाऱ्या निष्कर्षाची वाट पाहत आहोत.
आरोप करणाऱ्यावर एकाहून अधिक आरोप झाले त्याबाबतही सत्यता जाणून घेण्याची गरज आहे. आरोप झाला म्हणून सत्तेपासून दूर व्हा असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्ण शाहनिशा करुन पुढची पावलं टाकणार असल्याचे सांगत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टांगती तलवार कायम असल्याचे संकेत त्यांनी दिले.
भाजपाचं काय म्हणणं आहे माहिती नाही. काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे असं त्यांच्या मोठ्या नेत्याने म्हटलं आहे. त्यांच्याच पक्षातल्या माजी आमदाराने आपला अनुभव सांगितल्यानंतर भाजपा किंवा अन्य कोणी काय म्हणत असेल तर कदाचित ते टीका करण्याची संधी म्हणून करत असावेत. त्यावर काही बोलायचं नाही. हा त्यांचा अधिकार असल्याचेही ते म्हणाले.
ज्यांच्या हातातून सत्ता गेली आहे त्यांची अस्वस्थता समजू शकतो. ती गेल्यामुळे नाराजी असणार. त्यासाठी ज्यांनी हे सगळं काम केलं असेल त्यांना टार्गेट करुन त्यांना ठोकण्याचं काम करणं हे फारसं वेगळं समजत नाही. हे राजकारणात आक्रमपणे आरोप करणं आणि भूमिका घेण्याचा भाग असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी भाजपाला लगावला.
330 total views, 1 views today