पाण्यासाठी नगरसेवक शानू पठाण यांचे आयुक्तांच्या दालनाबाहेर हंडा आंदोलन

पद गेले तरी बेहत्तर, पाण्यासाठी संघर्ष करणारच- शानू पठाण
ठाणे : कळवा-मुंब्रा, कौसा आणि दिवा भागात सलग चार दिवस पाणी पुरवठा ठप्प झालेला असल्याने संतापलेल्या अश्रफ (शानू) पठाण यांनी ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या दालनाबाहेर हंडा घेऊन धरणे आंदोलन केले. या आंदोलनामुळे ठामपा अधिकार्‍यांची चांगलीच धावपळ उडाली. अखेर अधिकार्‍यांनी शानू पठाण यांची भेट घेऊन स्वतंत्र वितरण व्यवस्था निर्माण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पठाण यांनी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, पद गेले तरी बेहत्तर जनतेला पाणी मिळवून देण्यासाठी आपण झगडतच राहू, असा इशाराही यावेळी शानू पठाण यांनी दिला.
ठाणे महानगर पालिकेने शुक्रवारी महत्वाच्या कामांसाठी शटडाऊन घेतला होता. त्यामुळे सलग २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर शिळफाटा येथे जलवाहिनी फुटल्यामुळे सलग ४० तास पाणीपुवठा बंद ठेवण्यात आला. शनिवारपासून सोमवारपर्यंत पाण्याचा पुरवठा बंद असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. अधिकार्‍यांचे फोनही बंद असल्याचे परिस्थिती समजत नव्हती. यामुळे संतापलेल्या शानू पठाण यांनी थेट हंडा घेऊन ठामपा आयुक्तांचे दालन गाठले. अन् त्यांच्या दालनाबाहेरच हंडा घेऊन धरणे आंदोलन सुरु केले.त्यामुळे ठामपा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
अखेर कार्यकारी अभियंते अर्जुन आहेर आणि कार्यकारी अभियंते (पाणीपुरवठा) विनोद पवार यांनी शानू पठाण यांची भेट घेऊन त्यांची विनवणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लेखी पत्र दिल्याशिवाय माघार न घेण्याचा पवित्रा पठाण यांनी घेतला. अखेरीस ठामपाच्या वतीने शानू पठाण यांना, एमआयडीसीकडून कमीत कमी शटडाऊन घेण्यात येतील, घेण्यात येणा-या शटडाऊनचा कालावधी कमी असेल तसेच या शटडाऊनबाबत पुरेशा वेळेआधी महापालिकेला तसेच स्थानिक नागरीकांना कळविण्यात येईल, याबाबत एमआयडीसीला विनंती करण्यात येईल; शटडाऊनच्या कालावधीमध्ये आवश्यक त्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे किमान पाणी पुरवठा महापालिका तसेच खाजगी टँकरमार्फत करण्यात येईल; भविष्यामध्ये अशा प्रकारचा मोठा शटडाऊन घेण्याची वेळ आल्यास व त्यामुळे पाणी पुरवठा अनिश्चित कालावधी विस्कळीत झाल्यास ठाणे महानगरपालिकेच्या स्टेम यंत्रणेमार्फत होणारा पाणी पुरवठा त्या परिसरास करण्यासाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आठ दिवसांत मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.; मुंब्रा प्रभाग समितीकरीता पूर्णवेळ पाणी पुरवठा विभागासाठी कनिष्ठ अभियंता व उप अभियंता तीन दिवसात नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर पठाण यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, यावेळी पठाण यांनी, “ ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी कळवा, मुंब्रा, दिवा, कौसा भागातील जनतेच्या पाणीपुरवठ्याबाबत फारसे गंभीर नाहीत. त्यामुळे जनतेला पाण्याचा नियमित पुरवठा होत नाही. माझ्या जनतेला जर नियमित पाणीपुरवठा होत नसले तर मी नियमित रस्त्यावर उतरेन. त्यासाठी माझे पद बरखास्त केले तरी त्याची मला फिकीर नाही” असे सांगितले.

 279 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.