प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद द्या काश्मिर बदलेल

रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत सारंग गोसावी यांनी व्यक्त केला ‘असिम’ विश्वास
ठाणे : काश्मिर म्हटलं की, अशांतता, दहशतवाद आणि लष्करी कारवाया याबद्दल प्रतिक्रीया उमटतात. मात्र, सगळं काही सरकार करणार यापेक्षा आपणही काही जबाबदारी घेणे गरजेचे असुन प्रतिक्रीयेऐवजी ‘प्रतिसाद’ दिल्यास काश्मिर नक्कीच बदलेल.असा ‘असिम’ विश्वास सारंग गोसावी यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यातील सरस्वती सेंकडरी स्कुलच्या सभागृहात रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेतील ‘सध्याचे काश्मीर’ हे तिसरे पुष्प रविवारी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. व्याख्यानमालेचे अध्यक्ष ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी फळांची परडी देऊन त्यांचे स्वागत केले. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे सादरीकरण यंदा कोविड प्रादुर्भावामुळे पटांगणाऐवजी निमंत्रितांच्या उपस्थितीत बंदिस्त सभागृहात होत आहे.
धुमसत्या काश्मिरमध्ये बदल घडवण्यासाठी असिम फाउंडेशनच्या माध्यमातुन गेली १८ वर्षे असिम प्रयत्न करणारे पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनीअर सारंग गोसावी यांनी काश्मिरमधील आपले अनुभव म्हाळगी व्याख्यानमालेतुन मांडले. २०१९ मध्ये जम्मु-काश्मिरच्या स्वायत्ततेबाबतचा मोठा निर्णय झाल्याने लोकशाहीची पुर्नरचना करण्याचा हेतु साध्य झाला. सरकारने ‘बॅक टु व्हीलेज’ सारखे कार्यक्रम राबवल्यानंतर बऱ्याच अंशी स्थिती निवळली. ७० वर्षानंतर प्रथमच निवडणुका होऊन मतदानाचा हक्क बजावल्याचा आनंद येथील जनतेने अनुभवला. महत्वाचा बदल म्हणजे, डोमिसाईल प्रमाणपत्र मिळुन वाल्मिकीसारख्या विविध समाजांना न्याय मिळाला. प्रशासकीय कामकाज सुरळीत झाले.तरीही, तेथील लोकांमधील राग अजुनही कमी झालेला नाही. परंतु, भारतीय सैन्याकडुन चांगले काम सुरू असून मागील दिड वर्षात एकही निगेटीव्ह घटना घडलेली नाही. मात्र,लगेचच काही बदल होतील असे नाही. जम्मु-काश्मिरला आपण भारताचा अविभाज्य भाग मानतो तर, तेथे बदल घडवण्याची जबाबदारीही आपलीच आहे. सरकार करणार त्यापेक्षा आपणही छोटी-मोठी सुरूवात करणे गरजेचे असल्याचे मत गोसावी यांनी व्यक्त केले. यासाठी त्यांच्या ‘असिम’ या संस्थेमार्फत काश्मिरमध्ये सुरू केलेल्या विविध शैक्षणिक, क्रिडा तसेच, रोजगाराच्या उपक्रमांचा उहापोह उपस्थितांसमोर मांडताना, काश्मिरला उर्वरीत भारताशी जोडण्यासाठी आयटी कंपनी सुरू केल्याचे सांगितले. गेल्या दिड वर्षात काश्मिरमध्ये रस्ते, जलसंधारणाची, इन्फास्ट्रक्चरची कामे सुरू झाली असुन शिक्षणाच्याही नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. तेव्हा,जम्मु-काश्मिरवर वाईट मते बनवुन केवळ चर्चा आणि प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा त्याला प्रतिसादाचे रूप मिळणे गरजेचे आहे. किंबहुना, तेथील सकारात्मक बातम्या जनमानसात पोहचवण्याची जबाबदारी माध्यमांनी घ्यायला हवी. तेथील जनतेशी नाते जोडण्यासाठी सध्या ठाणे – डोंबिवलीतुन चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र, चर्चा आणि प्रश्नापेक्षा उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करून फेसबुक, व्हॉटसअप सारख्या सोशल माध्यमातुन जम्मु – काश्मिर अथवा लडाखचा एकतरी मित्र जोडा. असे आवाहनही सारंग गोसावी यांनी तरुणाईला केले आहे. कार्यकमाच्या समारोपाला श्रोत्यांच्या प्रश्नांनाही त्यांनी समर्पक उत्तरे देऊन शंकानिरसन केले.

 519 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.