प्रदूषण नियंत्रणासाठी टीएमटीच्या इलेक्ट्रॉनिक बसगाड्या चालवा


शमीम खान यांनी राज्य सरकारकडे मागणी
ठाणे : ठाणे महानगर पालिका क्षेत्रामध्ये वायूप्रदूषणाचा स्तर वाढत चालला आहे. त्यावर मात करण्यासाठी सबंध शहरात तसेच ठाण्याचे उपनगर म्हणून ओळख असलेल्या कळवा, मुंब्रा, दिवा भागात टीएमटीच्या इलेक्ट्रॉनिक बसगाड्या चालविण्यात याव्यात, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे परिवहन सेवेचे सदस्य शमीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात गेल्या अनेक दिवसांपासून वाहनांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. वाहने वाढत असल्याने प्रदूषणही वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बसगाड्या या मोठा पर्याय आहे. या बसगाड्या ठाणे शहरात धावल्यास प्रवासखर्चातही कपात होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन ५० इलेक्ट्रॉनिक गाड्या ठाणे परिवहन सेवेसाठी उपलब्ध करुन द्याव्यात, मागणी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा- मुंब्रा विधानसभा क्षेत्रअध्यक्ष तथा परिवहन सदस्य शमीम खान यांनी केली आहे. या संदर्भात शमीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब आणि ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याशीही पत्रव्यवहार केला आहे.
शमीम खान यांनी केलेली ही मागणी पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे या मागणीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येईल, असे डॉ. आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

 421 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.