कल्याणच्या तहसीलदारांना निवेदन देत वटहुकूम काढण्याची केली मागणी
कल्याण : मराठा आरक्षणास मिळालेल्या स्थगितीस योग्य मार्ग काढून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रणरागिणी प्रतिष्ठानने केली असून याबाबत त्यांनी कल्याणच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने ०९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा आरक्षणास अंतरिम स्थगिती दिलेली आहे. या निर्णयाचा सन्मान असून सदरच्या निर्णयांमध्ये चालू शैक्षणिक वर्ग २०२०-२१ मध्ये मेडिकल, उच्च शिक्षण व इतर शालेय वर्गासाठी मराठा आरक्षण रद्द करण्यात आलेले आहे. यापूर्वी झालेले शैक्षणिक प्रवेश व नोकर भरती संदर्भातील आरक्षण जैसे थे तैसे ठेवून शासनाने विशेष वटहुकूम काढून मराठा विद्यार्थ्यावरील अन्याय दूर करावा. त्यामुळे लाखोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण व नोकरी पासून वंचित राहणार नाही असे प्रतिष्ठानचे म्हणणे आहे.
तरी शासनाने मराठा आरक्षणाबाबत त्वरीत आदेश काढून यावर्षी शिक्षणापासून वंचित राहणा-या मराठा समाजातील युवकांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रणरागिणी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली असून यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्षा अजया श्याम आवारे, संपदा ब्रीद, रुपाली निंबाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.
707 total views, 1 views today