अनधिकृत मोबाईल टॉवरचे बांधकाम जमीनदोस्त करून संबंधित कंपनी, जागा मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निलतेजनगर संकुल सहकारी गृहनिर्माण संस्थेने केली आयुक्तांकडे मागणी
कल्याण : राखीव भूखंडावर नागरी वस्तीमध्ये मोबाईल टॉवर उभारण्यात येत असून या प्राणघातक मोबाईल टॉवरला येथील रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. याबाबतचे पत्र येथील रहिवाशांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.
कल्याण पश्चिमेतील रामबाग लेन नं. ४ या परिसरात निलतेजनगर संकुल सहकारी गृहनिर्माण संस्था असून याच्या बाजूलाच असलेल्या सर्वे नं. ८७/७ या राखीव भूखंडावर मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरु आहे. याबाबतीत येथील नागरिकांनी महानगर पालिकेकडे चौकशी केली असता पालिकेकडून कुठलीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे समजले. हा भूखंड राखीव असून मोबाईल टॉवर कंपनीने कोणत्याही परवानगी शिवाय याजागेवर १० फुट खोल पिलरचे बांधकाम करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांचा या मोबाईल टॉवरला विरोध असून हे काम पूर्ण होऊन मोबाईल टॉवर सुरु झाल्यास मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या प्राणघातक लहरींचा येथील नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची भिती या नागरिकांनी व्यक्त केली आहे. या टॉवरच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर दाटीवाटीने लोकसंख्या असून येथील नागरिकांचा विरोध लक्षात घेता हे अनधिकृत मोबाईल टॉवरचे बांधकाम जमीनदोस्त करून संबंधित कंपनी, जागा मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निलतेजनगर संकुल सहकारी गृहनिर्माण संस्थेने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
464 total views, 1 views today