एसटी’ कर्मचाऱ्यांचा पगार होणार, ५५० कोटी रूपयांचा निधी मंजूर

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय

मुंबई : मागील काही महिन्यापासून एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पैसा नसल्याने पगारी देणेही महामंडळाला शक्य होत नव्हते. यापार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून वित्तीय मदत मिळावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत होते. त्यास यश येत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाला (एसटी) ५५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटीसमोरील वाढलेली आव्हाने, महसुलात झालेली घट लक्षात घेऊन एसटी महामंडळाला हा निधी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात आज मंत्रालयात एक बैठक झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात आज ‘एसटी’ महामंडळाच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, वित्त विभागाचे, तसेच एसटी महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एसटीला ५५० कोटी देण्याचा निर्णय वित्तमंत्र्यांनी जाहीर केला. या निर्णयामुळे एसटी महामंळाच्या समोरील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.
बैठकीत एसटी महामंडळाच्या सद्यस्थितीवर चर्चा होऊन आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाला मोठा दिलासा मिळणार आहे.

 314 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.