एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांना जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देणार
मुंबई : राज्यात मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा सुरु झाला असून राज्य मंत्रिमंडळाने या टप्प्यामध्ये काही निर्णय घेतले आहेत. यामध्ये लॉकडाऊन झाल्यापासून राज्यात सुरु झालेली शिवभोजन थाळी ही पाच रुपयांना दिली जात होती. ती पुढील तीन महिने पाच रुपयांनाच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय अन्य महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
मुंबई उपनगरातील जुहू बिचवरील खाद्यपेये विक्रेते को.ऑप.सोसायटी लि.यांना भाडेपट्टयाने मंजूर केलेल्या जमिनीच्या भुईभाड्याच्या दराबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ कलम २६, १४८-अ मध्ये सुधारणा अध्यादेश प्रख्यापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
जल जीवन मिशनलाही सुरुवात करण्यात येणार असून राज्यातील लॉकडाऊन परिस्थितीत उत्पादित झालेल्या अतिरिक्त दूधाच्या नियोजनाच्या योजनेस मुदतवाढीचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे ‘आता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग,’ असे नामकरण करण्यात आले आहे. आयडीबीआय बँक, महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक या शासकीय मालकीच्या बँकांना तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास परवानगी देण्यात आली आहे.
शिवभोजन थाळीचा दर पुढील ३ महिन्यांसाठी ५ रुपये एवढा ठेवण्यात येणार आहे. हा दर लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर बदलण्यात आला होता. याशिवाय एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांना जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा २ राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
778 total views, 1 views today