केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी
मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक पवित्र वास्तूवर झालेल्या हल्ल्याच्या तीव्र निषेध करून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या हल्ल्याची सीआयडी द्वारे चौकशी करावी अशी मागणी केली आहे .याबाबतचे पत्र त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविले आहे.
राजगृह हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ निवासस्थान आहे. या निवासस्थानात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते.त्यामुळे राजगृह ही पवित्र वास्तू आहे. मुंबईत दादरमधील राजगृह हे ग्रंथांसाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली वास्तू आहे. ही वास्तू ग्रंथांसाठी म्हणून उभारलेली एकमेव वास्तू ठरू शकते.जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे राजगृह प्रेरणास्थान ऊर्जास्थान आहे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि पवित्र असणा-या राजगृह या वास्तूवर हल्ल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे. राजगृहाचा अवमान करण्याचा हा पहिलाच निंदनीय प्रकार घडला आहे. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा करावी या मागे कुणाचा हात आहे हे शोधण्यासाठी या हल्ल्याची सीआयडीद्वारे सखोल चौकशी करावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
573 total views, 1 views today