कोरोना चाचण्या कमी होत असल्याचे सरकारच्याच प्रसिध्दी पत्रकातच उघडकीस, ३८ हजार चाचण्या होतच नसल्याचे झाले स्पष्ट
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे धोरण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यासाठी राज्यात १०० प्रयोगशाळांची स्थापना केली. या प्रयोगशाळांमुळे राज्यात प्रतिदिन ३८ हजार चाचण्या होत असल्याचा दावा वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केला. परंतु प्रत्यक्षात प्रतिदिन ७७१५ कोरोनाचाचण्या होत असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकात केल्याने वैद्यकिय शिक्षण विभाग मंत्र्यांच्या दावा पोकळ ठरल्याचे उघडकीस आले.
कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर जास्तीत जास्त ट्रेसिंग आणि टेस्टींग झाले पाहिजे अशी भूमिका सुरुवातीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतली. त्यानुसार काम करण्यासाठी टेस्टींग अर्थात चाचण्या करण्यासाठी म्हणून प्रयोगशाळांची संख्या कमी असल्याने अडचणी येत होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ८, नंतरच्या टप्प्यात ८ आणि नंतर संपूर्ण राज्यभरातील वैद्यकिय विभागाच्या अखत्यारित असलेल्या वैद्यकिय महाविद्यालयात, महापालिकांच्या रूग्णालयात आणि जिल्हा रूग्णालयात कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या. त्यातील १०० वी प्रयोग शाळा मुंबईतील जीटी हॉस्पीटल येथे सुरू करण्यात आली. त्यावेळी वैद्यशिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, सद्यपरिस्थिती शासकिय प्रयोगशाळांमध्ये १७ हजार ५०० तर खाजगी प्रयोगशाळांमध्ये २० हजार ५०० चाचण्या अशा दिवसाकाठी ३८ हजार चाचण्या होत असल्याचे जाहीरपणे सांगितले.
मात्र प्रत्यक्षात काल २ जून रोजी सार्वजनिक विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमतंर्गत कोरोनाबाधित रूग्ण, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या जाहीर करताना राज्यात प्रत्यक्षात ७७१५ चाचण्या करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्यातील कोरोना प्रयोगशाळांमध्ये पुरेशा चाचण्याच होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
यासंदर्भात वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख, एकात्मिक रोग सर्वेक्षणचे प्रमुख डॉ. आवटे यांच्याशी फोन आणि एसएमएसद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
२० जून २०२० रोजीचे अमित देशमुख यांचे वक्तव्य
३८ हजार चाचण्या- वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हा महाराष्ट्रात फक्त पुणे आणि कस्तुरबा रुग्णालयात चाचण्यांची सुविधा होती, मात्र आज महाराष्ट्रात १०० हून अधिक प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची तपासणी होत आहे. आज शासकीय लॅबमध्ये १७५०० तर खाजगी लॅबमध्ये २०५०० अशा जवळपास ३८ हजार चाचण्या एका दिवसात होत आहेत. याचाच अर्थ अडीच महिन्यातच आपण ही यंत्रणा उभी केली आहे. आज महाराष्ट्रातील २० वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरणकक्ष, आयसीयू वार्ड तयार करण्याबरोबरच ‘समर्पित कोविड रुग्णालये’ तयार करण्यात आली आहेत. देशात स्वस्त व सुलभ कोरोना चाचणी करण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून त्यामुळेचे कोरोनाच्या या आपत्तीत महाराष्ट्राने केलेले काम पथदर्शक ठरेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला. प्रारंभी वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रास्ताविक करून रुग्णालयाची माहिती दिली.
२ जूलै २०२० रोजी एकात्मिक रोग सर्वेक्षण विभागाने जाहीर केलेले चाचण्यांची आकडेवारी
राज्याने प्रयोगशाळा चाचण्यांचा १० लाखांचा टप्पा ओलांडला
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १०,२०,३६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १,८६,६२६ (१८.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ६४ शासकीय आणि ५० खाजगी अशा एकूण ११४ प्रयोगशाळा कोविड १९ निदानासाठी कार्यरत असून दर दशलक्ष लोकसंख्येमागे राज्यातील चाचण्यांचे प्रमाण ७७१५ एवढे आहे. हे प्रमाण देशपातळीवर ६३३४ एवढे आहे. १ जुलै २०२० देशभरात ९०,५६,१७३ प्रयोगशाळा चाचण्या झाल्या असून त्यातील ११.२६ टक्के चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.
587 total views, 1 views today