आरोग्य सैनिक असलेल्या आशा सेविकांना सन्मानजनक मानधन द्या

अमित ठाकरेंनी लिहिले उपमुख्यमंत्री पवार आणि आरोग्य मंत्री टोपेंना पत्र

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वाधिक मदत आणि पुढाकार घेणाऱ्या आरोग्यसेविका अर्थात आशा वर्करना इतर राज्यात चांगले मानधन मिळत असताना महाराष्ट्रात फारच कमी मानधन मिळते. त्यामुळे या आशावर्करना चांगले-सन्मान जनक मानधन द्यावे अशी मागणी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवित केली.
राज्यात ७२ हजार आशा वर्कर काम करत आहेत. या वर्कर ग्रामीण भागातील वाडी, वस्तीपासून शहरातील झोपडपट्यांमध्ये राहणाऱ्या घराघरात पोहोचून आजारांच्या लक्षणांची माहिती जमा करणे, गरोदर महिलांना रूग्णालयात नेणे यासह ७०-७५ कामे करत असतात. या वर्करंना केवळ २,५०० रूपयांचे मानधन मिळते. मात्र याच वर्करना इतर राज्यात केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मानधना व्यतीरिक्त ४ हजार ते १० हजार रूपयांचे मानधन दिले जाते. त्यानुसार राज्यातील वर्करनाही सन्मानजनक मानधन द्यावे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
सरकारला लिहिलेल्या पत्राचा सारांश
परवा काही ‘आशा’ स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त रु. १६०० मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र ‘आशां’ना दर महिन्याला रु. ४,००० ते १०,००० इतका मोबदला मिळत आहे.
आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकटकाळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे.
त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं.
– अमित ठाकरे,
नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

 341 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.