राऊतजी, २ हजार रूपया पर्यतचे वीजबील माफ करा

उद्योगांना अंदाजीत बीले पाठविण्याऐवजी योग्य बीले पाठविण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई : लॉकडाऊनमुळे मुंबईसह राज्यातील सर्वच आर्थिक, व्यवसाय केंद्रे बंद आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना घरी बसावे लागले. त्यातच या नागरिकांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळालेच असे नाही. त्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यातच आता दोन महिन्याची वीज बिले वीज कंपन्यांनी एकमद अंदाजित वाढीव रकमेची जाहीर केल्याने सर्वसामान्य नागरिकांना वीज बील भरणे अडचणीचे ठरत असल्याने मुंबईसह राज्यातील २ हजार रूपयांपर्यतचे वीज बील माफ करण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरजीत मनहास यांनी एका पत्राद्वारे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडे केली.
मागील दोन-अडीच महिन्याच्या कालावधीत अनेकांना कामावरच नसल्याने वेतन मिळालेले नाही. ज्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करणे शक्य आहे. त्यांच्याकडून कंपन्यांनी काम तर करून तर घेतले मात्र अद्याप पूर्ण वेतन दिलेले नाही. अशा अवस्थेत सर्वसामान्य नागरिकांना वीज बील भरण्यासाठी पैसे नाहीत. ज्या वीज ग्राहकांना पूर्वी २ हजारापर्यंत वीज बील यायचे त्यांना एकदम आता अंदाजित बीलामुळे ५० हजार रूपयांचे वीज बील आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरची रक्कम कशी भरावी असा सवाल उपस्थित त्यांनी पत्राद्वारे केला.
त्याचबरोबर उद्योजक, कंपन्या आदींनाही त्यांचे कारखाने, कार्यालये बंद असताना अशीच भरमसाठ वीज बीले आलेली आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोरही ही वाढीव दरातील बीले भरायची कशी असा सवाल निर्माण झाला आहे. ही वाढीव बिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी वीज कंपन्यांकडून विभागीय स्तरावर किंवा मतदारसंघ निहाय समित्या स्थापन करून त्यांच्या मार्फत वाढीव वीज बीलांचा प्रश्न सोडवावा अशी मागणीही त्यांनी केली.
त्यामुळे वीज कंपन्यांनी अंदाजित बीले पाठविण्याऐवजी सर्व वीज ग्राहकांच्या घर, कंपनी, कारखान्यातील वीज मीटरचे रिडींग घेवून त्यानुसार बील द्यावे आणि किमान २ हजाररूपयां पर्यतचे वीज बील माफ करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

 334 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.