चाकरमान्यांसाठी भाजपाची १४ ट्रक मदतसामुग्री रवाना

कोकणवासियांना सर्व ती मदत करणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासियांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘कोकणच्या मदतीला भाजपा’ या अभियानांतर्गत १४ ट्रक मदतसामुग्री सोमवारी महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यालय, मुंबईहून कोकणात रवाना करण्यात आली.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, सुनील राणे, राहुल नार्वेकर आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. या मदतसामुग्रीत अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेल, कोळसा, सिमेंटचे पत्रे, ताडपत्री, सोलर कंदिल, मेणबत्ती, माचिस आदी सामुग्रीचा समावेश आहे. मुंबई भाजपाच्या वतीने गेली दोन दिवस एक अभियान राबविण्यात आले आणि त्या अभियानातून जनसहभागातून ही मदतसामुग्री गोळा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात जी मदत गोळा झाली, ती १४ ट्रक सामुग्री सोमवारी रवाना करण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि कोकण विभागाच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली होती आणि त्यात मदतसामुग्री तातडीने रवाना करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनानुसार, ‘कोकणच्या मदतीला भाजपा’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे.
कोकणावर आलेले हे संकट मोठे आहे आणि या संकटात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कोकणवासियांच्या पाठिशी उभी राहील. तातडीच्या स्वरूपात जी काय मदत लागेल, ही त्यांना देण्यासाठी पक्ष काम करेल. आज पहिल्या टप्प्यात १४ ट्रक मदतसामुग्री रवाना करण्यात येत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाला तर आहेच. पण, वीजेची आवश्यकता लक्षात घेता सोलर कंदिल आणि निवाऱ्याच्या सुविधा लक्षात घेता सिमेंटचे पत्रे आणि ताडपत्री यांचा समावेश यात करण्यात आला आहे. यापुढे सुद्धा हा उपक्रम असाच सुरू राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 526 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.