मुरबाड, शहापूरमध्ये जलसंधारणाची कामे सुरू
मुरबाड : सरत्या उन्हाळ्याच्या या दिवसात कोरड्या पडलेल्या गाव तलावांमधील गाळ काढून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जलसंधारण करण्याची मोहीम सध्या ठाणे जिल्ह््यात राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन, वसुंधरा संजीवनी मंडळ आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील एकुण ३० गावांमधील गाळामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या तलावांना नवसंजीवनी दिली जाणार आहे. ‘करोना’ संचारबंदीमुळे गेले दोन महिने ग्रामीण भागातील कामेही ठप्प झाली होती. मात्र तलावातील गाळ काढण्याच्या निमित्ताने या परिसरातही कामांची लगबग सुरू झाली आहे. तलावांमधील गाळ काढल्यामुळे पुढील वर्षी परिसरातील शेतकऱ्यांना दुबार पीकासाठी कोट्यवधी लिटर्स अधिक पाणीसाठा उपलब्ध होईल, असा विश्वाास वसुंधरा संजीवनी मंडळाच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केला आहे.
भरपूर पाऊस पडूनही ठाणे जिल्ह््यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात पाणी टंचाई भेडसावते. अनेक गावांना काही महिने टँकरने पाणी पुरवावे लागते. रोटरी, वसुंधरा संजीवनी मंडळ आदी स्वयंसेवी संस्थांनी सीएसआर आणि लोकसहभागातून जिल्हयाच्या ग्रामीण भागात नैसर्गिक ओढ्या नाल्यांवर सीमेंट बंधारे बांधले आहेत. त्यामुळे एरवी डिसेंबर-जानेवारी महिन्यात कोरड्या पडणाऱ्या ओढ्या नाल्यांमध्ये आता मे महिन्यापर्यत पाणी राहू लागले आहे. पाणी उपलब्ध झाल्याने तेथील शेतकऱ्यांना दुबार पीक घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सीमेंट बंधारे निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर वर्षानुवर्षे दुर्लक्ष केल्यामुळे गाळाने भरलेल्या गाव तलावांना संजीवनी देण्याची योजनाही काही महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने वुसंधरा संजीवनी मंडळाच्या मदतीने हाती घेतली. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या कामात विशेष लक्ष घातले. दिवाळीनंतर ‘वसुंधरा’च्या पदाधिकाऱ्यांनी काही निवडक गाव तलावांचे सर्वेक्षण करून या मोहीमेची तयारीही केली. पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार या मोहीमेचे काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार होते. मात्र करोना संकटामुळे हे काम वेळेत सुरू होऊ शकले नाही. मात्र आता काही दिवसांपूर्वी तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना सुरूवात झाली असून त्याला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहकार्य केले आहे.
मुरबाड तालुक्यातील १४ आणि शहापूरमधील १६ अशा एकुण ३० तलावांचा गाळ काढण्याची योजना असली तरी पहिल्या टप्प्यात दहा तलावांची कामे सध्या सुरू असल्याची माहिती वसुंधरा संजीवनी मंडळाचे मिलिंद केळकर यांनी दिली. या मोहीमेसाठी जिल्हा प्रशासनाने सीएसआर निधीतून १८ लाख रूपये उपलब्ध करून दिले आहेत.
मुरबाड तालुक्यातील वैशाखरे, खेडले, वाघाची वाडी, शहापूर तालुक्यातील आष्टा, शिवनेर,खरीवली (सो) येथील तलावांची कामे सध्या सुरू असून पाऊस पडेपर्यंत गाळ उपसा केला जाणार आहे. वाघाची वाडी येथे गाळ काढण्याचे काम सुरू होताच अवघ्या दोन फुटांवर पाणीही लागले आहे.
608 total views, 1 views today