मुंबई हल्ल्यातील प्रमुख दहशतवादी अजमल कसाबच्या खटल्यातील होते मुख्य साक्षीदार
डोंबिवली : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबच्या खटल्यातील मुख्य साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे आजारपणात मंगळवारी सांयकाळी निधन झाले. हरिश्चंद्र श्रीवर्धनकर हे कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार होते. कसाबला फाशी देण्यात ते मुख्य साक्षीदारांपैकी एक होते.
कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरातील वास्तुसिध्दी इमारती मध्ये राहत होते. मुळचे कोकणातील हरिहरेश्वर येथील असणारे, अन्न नागरीपुरवठा खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी होते. हरिश्चंद्र यांनी विशेष न्यायालयासमोर कसाबला ओळखले होते आणि त्याच्याविरुद्ध साक्ष दिली होती.काही दिवसांपूर्वी हरिश्चंद्र अत्यंत कठीण परिस्थितीत होते. ते निराधार अवस्थेत फूटपाथवर आढळले होते. बरेच दिवस त्यांनी काही खाल्ले नव्हते. मुंबईतील चिंचपोकळी येथील सातरस्ता येथील डिसुझा नामक दुकानदाराने श्रीवर्धनकरांना मदत केली आणि पोलिसांच्या मदतीने कुटुंबाशी भेट घडवली. या घटनेनंतर तातडीने गौरीपाडा प्रभागाचे भाजपा नगरसेवक दया गायकवाड यांनी प्रभागातील देशप्रेमी, निडर, दक्ष नागरिक हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांना मदतीचा हात देत खाजगी हाँस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केले होते. हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कल्याणमधील खाजगी हॉस्पिटलमध्ये भेटीला आले होते. यासमयी भाजपतर्फे श्रीवर्धनकर कुटुंबीयांना १० लाखांचा मदतनिधी देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले होते. अखेर या आजारपणामुळे मंगळवारी सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले , दोन सुना एक मुलगी जावई, असा परिवार असुन ,त्यांच्या अंतयात्रेत,गर्दी न होऊ देता सोशल डिस्टन पाळत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, माजी महापौर, नगरसेवक राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दया गायकवाड आदी मोजकेच नागरिक उपस्थित होते.
454 total views, 1 views today