या अधिवेशनातील कामकाज ठरवण्यासाठी येत्या सोमवारी १८ मे रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणारआहे.
मुंबई : कोरोनाचे संकट असले तरी विधिमंडळाने आणि राज्य सरकारने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे. २२ जून रोजी राज्याचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरेही विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेल्याने त्यांच्याही डोक्यावरची टांगती तलवार दूर झाली आहे. या अधिवेशनातील कामकाज ठरवण्यासाठी येत्या सोमवारी १८ मे रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा होऊन ते निश्चित केले जाईल. असं असलं तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हे अधिवेशन पुढे जाण्याची शक्यता आहे.
तरीही नियमांनुसार आणि सर्व शक्यता गृहित धरून विधिमंडळाला आणि सरकारला अधिवेशनाची तयारी करावी लागणार आहे. त्यासाठीच सोमवारी विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर तसंच सर्व पक्षाचे गटनेते उपस्थित असतील.
दुसरीकडे विधिमंडळानेही अधिवेशनाची तयारी म्हणून आमदारांकडून ऑनलाईन सारंकित प्रश्न मागवण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी विधानपरिषदेसाठी साडे सहाशे प्रश्न दाखल झाले आहेत. येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
391 total views, 1 views today