प्रतिज्ञापत्रावर मार्च महिन्याच्या तारखा आल्या कशा?

आम्हाला केवळ मूर्ख बनवण्यात आलं, असा संताप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला.

जळगाव : संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या तिघांचीही नावे फायनल झाली असून केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात इतरांचीच नावे जाहीर करण्यात आली. ज्यांची नावं जाहीर केली, ते मुंबईत फॉर्म भरण्यासाठी आले कसे? अर्जासोबत लागणारी कागदपत्रे लॉकडाऊनच्या काळात त्यांनी तयार केली कशी? याचा अर्थ त्यांची नावं आधीच ठरलेली होती. हे सर्व पूर्वनियोजित होतं. आम्हाला केवळ मूर्ख बनवण्यात आलं, असा संताप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस मीच केली होती. त्याचीच आज शिक्षा भोगतोय, अशी खदखदही त्यांनी व्यक्त केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ज्यांच्या नावाची साधी चर्चाही झाली नाही, अशा लोकांना तिकीटं देण्यात आली. आमची नावं फायनल होऊनही आमचा पत्ता कापण्यात आला. ज्यांना तिकीट देण्यात आले त्यांनी रात्रभरात उमेदवारी अर्जासोबत लागणारी कागदपत्रं आली कशी? त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर मार्च महिन्याच्या तारखा आल्या कशा? याचा अर्थ त्यांना उमेदवारी मिळणार हे मार्चमध्येच निश्चित झालं होतं. आम्हाला मात्र मूर्ख बनवून आमची फसवणूक करण्यात आली, असं ते म्हणाले. आम्हाला डावलून इतर निष्ठावंतांना तिकीट दिलं असतं तर समजू शकलो असतो, असं सांगतानाच चंद्रकांत पाटलांसाठी ज्या मेघा कुलकर्णींनी आमदारकीची सीट सोडली. त्यांना तरी विधानपरिषदेचं तिकीट द्यायला हवं होतं ना? असा सवालही त्यांनी केला.
पक्षश्रेष्ठींना हा सर्व प्रकार सांगणार आहे. त्यांच्याकडून समाधान नाही झाले तर पुढचा निर्णय घेईल. पण पक्षश्रेष्ठींच्या कानावर ही बाब टाकल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माझा पत्ता कट होण्यामागे केंद्रीय नेतृत्वाचा काहीही संबंध नाही. राज्यातील नेत्यांनीच पत्ता कट केला आहे. राज्यातील नेत्यांनीच केंद्रीय नेतृत्वाकडे माझ्याविरोधात विषपेरणी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
पाटील-फडणवीसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न
गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. पण संपर्क होत नाही. माझा काय दोष आहे? मी काय चूक केली? असे मला फडणवीसांना विचारायचे आहे. माझी जर काही चूक असेल तर माफी मागायलाही तयार आहे, असेही ते म्हणाले.

१७-१८ आमदारांचे समर्थन
विधान परिषदेसाठी मला काँग्रेसने ऑफर दिली होती. माझ्यासाठी भाजपमधील ७-८ आमदार क्रॉस व्होटिंगही करायला तयार होते. पण वेळ फार कमी होता. त्यामुळे मी काँग्रेसला नकार दिला, असे सांगतानाच करोनाचे संकट टळल्यानंतर माझ्या १७-१८ समर्थक आमदारांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्या शिफारशीची शिक्षा भोगतोय

विधानसभेचा विरोधी पक्षनेता असताना मीच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची शिफारस केली होती. आपल्या नावाची शिफारस करावी म्हणून फडणवीस महिनाभर माझ्या बंगल्यावर चकरा मारत होते. त्या माझ्या शिफारशीची शिक्षा आज मी भोगतोय, अशी खदखदही खडसे यांनी व्यक्त केली.
कराडांची उमेदवारी कायम
दिल्लीतून भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. त्यात अजित गोपछडे यांच्या नावाचा समावेश असताना रमेश कराड यांनी उमेदवारी दाखल केली होती. परंतु, ऐनवेळी गोपछडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेवून राखीव उमेदवार रमेश कराड यांचा अर्ज कायम करण्यात आला आहे. सोबतच संदीप लेले यांनीही उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. गोपछडे यांची उमेदवारी मागे घेण्यामागे वंजारी समाज नाराज असल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी रमेश कराड यांची उमेदवारी कायम केले असल्याचे सांगितले जात आहे.

 351 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.