प्रमोटी आयएएसना बाजूला सारून थेट सनदी अधिकाऱ्यांकडे जबाबदाऱी सोपविचा विचार
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात दोन वेळा लॉकडाऊन राबविण्यात आला. आता तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनची मुदतही संपत आलेली आहे. तरीही राज्यातील अनेक जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यात जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याने आजा जिल्ह्यांचे कप्तान अर्थात जिल्हाधिकारी बदलण्याचा विचार राज्य सरकारकडून गंभीरपणे करण्यात येत असून विशेषत: महसूली यंत्रणेतून आयएएस अधिकारी झालेल्या अधिकाऱ्यांना विद्यमान जबाबदारीपेक्षा इतर जबाबदाऱ्या सोपविण्याचा विचार सुरु असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
राज्यातील ३८ जिल्ह्यांपैकी जवळपास १७ जिल्ह्यांमध्ये महसूली केडरमधून आयएएस अधिकाऱी हे जिल्हाधिकारी पदावर नियुक्त आहेत. तसेच कोरोना विषाणूच्या पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील तीन-सहा जिल्हे, विदर्भातील तीन जिल्हे हे कोरोनामुक्त जिल्हे म्हणून ओळखले जात होते. मात्र जसजसे दिवस उलटायला लागले. तसतसे कोरोनामुक्त असलेले ग्रीन जिल्हे हे कोरोनाबाधीत क्षेत्रात यायला लागले. तसेच या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ठिकठिकाणी लॉकडाऊन प्रभावीपणे राबविण्यात आला नाही. परिणामी ठिकठिकाणच्या भागात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, वर्धा आदी जिल्ह्यामध्येही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे या सर्वच बाधीत जिल्ह्यांचे नेतृत्व नव्या विचारधारेच्या आयएएस अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा विचार सुरु आहे. मध्यंतरी दोनवेळा केंद्रीय पथकाने राज्यातील कोरोनाबाधीत क्षेत्रांची माहिती घेतली. तसेच काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यावेळी जिल्हाचे नेतृत्व करणाऱ्या अनेक जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाबाबत या पथकाने नाराजी व्यक्त केली. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिकेतील प्रमुख तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्याचधर्तीवर या राज्यातील जिल्हा प्रशासनातही अशाच पध्दतीचे बदल करण्याचे धोरण राज्य सरकारने स्विकारल्याने त्या अनुषंगाने आराखडा तयार करण्याचे काम आणि त्या त्या सक्षम अधिकाऱ्यांचा निवड करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी बदल्या-प्रमोशन न करण्याचे आदेश विभागांना काढलेले असले तरी जिल्हाधिकारी बदलीचे आदेश पुढील काही दिवसात निघाल्यास आश्चर्य वाटायला नको.
444 total views, 1 views today