संपूर्ण जग ‘कोरोना’च्या विळख्यात सापडले आहे.हा विळखा हळूहळू घटट होत चालला आहे.हुशार मानवजात ह्या विळख्यातून आपली सुटका करण्याचा अटोकाट प्रयत्न करीत आहे.एकीकडे करोनाने आर्थिक,सामाजिक,मानसिक,
शैक्षणिक इ. क्षेत्रांमध्ये सर्वांच्या झोपा उडवल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला जगातील सर्व देश आपापल्या परिने यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
यातील शैक्षणिक क्षेत्राचा विचार या लेखाच्या माध्यमातून आपण करणार आहोत.
आपल्या पैकी बऱ्याच जणांना ठावूक असेल ते प्रा.यशपाल यांचे दूरदर्शनवर प्रक्षेपित केले जाणारे विज्ञान या विषयावरील व्याख्यान.हा ई-लर्निंगचा पहिला प्रयत्न म्हणता येईल.
ई-लर्निंग नावाचा प्रकार आता थोडा थोडा आपल्या देशामध्ये म्हणा वा राज्यामध्ये म्हणा रुजायला सुरुवात झाली आहे.
ई-लर्निंग क्लासरुम,टॅब वापरून केलेला अभ्यास,व्हचुअल क्लासरूम(आभासी वर्ग )इ.प्रकार सर्वश्रुत आहेत.यातील वापराचा बहुतेक प्रकार शाळेच्या सांपत्तिक स्थितीवर अवलंबून असतो.अगदी आता आतातर महापालिकेच्या शाळामध्ये हि टॅब वाटप करून त्याद्वारे डिजिटल क्रांती घडवविण्याचा प्रयत्न होत आहे.त्यातील यशापयश हा वेगळा मुद्दा होऊ शकतो.काही ग्रामीण भागात सुद्धा डिजिटल क्लासरूमचा वापर अनेक तांत्रिक बाबीवर मात करून यशस्वीपणे सुरू आहे.पण तरी सुद्धा ग्रामीण काय अगदी मुंबई,ठाणे इ.शहरी भागात देखील ई-लर्निंग चा वापर मोठ्या प्रमाणावर असे नाही पण बऱ्यापैकी होऊ लागला होता.
कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनने तर ई-लर्निग हा ‘सोशल डिस्टसिंग’ सांभाळून शिक्षण देण्याचा उत्तम पर्याय होऊ शकतो हे शैक्षणिक क्षेत्राला दाखवून दिले आहे.
ई-लर्निंगचा शैक्षणिक क्षेत्रातीत वापरः-
आपण कितीही म्हटलं कि ई-लर्निंगचे अनेक फायदे आहेत.ई-लर्निंग हे शैक्षणिक क्षेत्राला लाभलेले वरदान आहे.शिक्षण क्षेत्राचे भाविष्य आहे.इत्यादी इत्यादी.पण ह्या ई-लर्निंगचा आपणं तांत्रिक वा इतर कारणे देऊन वापरच टाळला तर सगळं मुसळं केरात.आणि आता पर्यंत हेच होत होत.अगदी लॉकडाऊनची सुरुवात होई पर्यंत. पण कोरोनाचा जबरदस्त हिसका सर्व झारीतील शुक्राचार्यांना मिळाल्यामुळे सर्व शाळा-महाविद्यालये,विदयापीठे,इतर शैक्षणिक संस्था खडबडून जाग्या झाल्या. इतक्या दिवस ऑफ लाईन असणारे हे सर्व अनिच्छेनेका होईना पण ऑन लाईन आले.ह्या सर्वांना ई-लर्निंगचे महत्त्व लॉकडाऊन मुळे अगदी प्रर्कषाने जाणवायला लागले.आणि क्षणार्धात सर्व तांत्रिक व इतर बाबी बाजूला सारून त्यावर योग्य तो उपाय योजून ई-लर्निंगला अखेर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रक्रम देण्यात येतोय.हि फार स्तुत्य बाब आहे.
आजमितीस जवाहरलाल नेहरू विद्यापीठ,मुंबई विद्यापीठ,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ,तसेच विविध शाळा-महाविद्यालये,इतर शैक्षणिक संस्था ह्या ई-लर्निंगचा वापर करताना दिसत आहेत.हि शैक्षणिक क्षेत्रात येत्या काही काळात होणाऱ्या क्रांतीकारी बदलाची नांदीच समजूया.
ई-लर्निंग क्षेत्रात याघडीला बैजू,गूगल क्लासरुम,झूम इ. पर्याय उपलब्ध आहेत. पर्याय फार कमी आहेत पण आता ई-लर्निंगचे महत्त्व पटायला लागल्यामुळे आता या पर्यायात सुद्धा वाढ होईल.नवीन नवीन ई-लर्निगवर आधारित पर्याय आपल्याला मिळतील.
ई-लर्निंगचे फायदे व अडचणी:-
ई-लर्निंगचा आजच्या घडिला होणारा फायदा म्हणजे ‘सोशल डिस्टंसिंग’ सांभाळून मिळणारे घरपोच शिक्षण.
ई-लर्निंगमुळे घरातील लहान मुलांना योग्य गोष्टीमध्ये गुंतवून ठेवण्याचा पालकांना एक मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे.
विद्यापीठ,महाविद्यालये,शाळा यांना लॉकडाऊनमुळे असंख्य विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान ई-लर्निंगच्या पर्यायामुळे टाळता येणे शक्य होईल.
भविष्यात ई-लर्निंग व क्लास रूम लर्निंग किंवा फक्त ई-लर्निंग असे पर्याय शैक्षणिक क्षेत्राला उपलब्ध झाले आहेत.
ई-लर्निंग क्षेत्रात आता गुंतवणूक करण्यासाठी मोठमोठे उद्योगपती गंभीरपणे विचार करतील.यामुळे या क्षेत्रातील उद्योगांना सुगीचे दिवस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ई-लर्निंगमुळे शाळा-महाविदयालये यांच्या खर्चामध्ये हि मोठी बचत होईल.
ई-लर्निंगमुळे प्रत्यक्ष शाळा-महाविदयालयामध्ये काही कारणास्तव नियमित जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळेल.
ई-लर्निंग मध्ये मोठी अडचण म्हणजे तांत्रिक बाबी.इंटरनेटचे जाळे अधिक प्रबळ व जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहचेल या साठी सर्व पातळीवर प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे.
आर्थिक बाबींबाबत हि समर्थ तोडगा सुचवायला हवा.मोठ्या उद्योगांना ह्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करायला हवे.
सरकारने हि शैक्षणिक क्षेत्रात विशेष करून ई-लर्निंगमध्ये योग्य ती आर्थिक तरतूद केल्यास ह्याचा प्रचार-प्रसार आणि वापर सर्वांपर्यंत पोहचेल.
एकंदरीत काय तर आता लॉकडाऊनमुळे ई-लर्निंग बाळसे धरू लागले आहे.ह्याची जडण घडण योग्यप्रकारे व्हावी हिच इच्छा.
प्रशांत हनुमंत जाधव
ठाणे.
531 total views, 1 views today