एका दिवसात सुमारे २४० रिक्षाचालकांना मोफत अन्नधान्याचे वाटप

हेरिटेज बजाजचे संचालक सुरेंद्र उपाध्याय यांनी घेतला पुढाकार

ठाणे : लॉकडाऊनमुळे सध्या रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या रिक्षाचालकांच्या घरातील चूल विझू नये, यासाठी हेरीटेज बजाजचे संचालक सुरेंद्र उपाध्याय यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी शुक्रवारी आवाहन करुन रिक्षाचालकांना संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शनिवारी सुमारे २४० रिक्षाचालकांनी उपाध्याय यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर उपाध्याय यांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत या २४० जणांना अन्नधान्याचे वाटप केले.
देशात, राज्यात कोरोना विषाणूची महामारी जोरात फैलावत आहे. शासनाच्या आवाहना नुसार महाराष्ट्रातील कोरोना संकटाचा सामना सगळी जनता करीत आहे.राज्यात महाराष्ट्र सरकारने संचारबंदी, लॉकडाऊन सारखे चांगले निर्णय घेऊन कोरोना विषाणूचा प्रभाव, प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक योजना अमलांत आणल्या आहेत. मात्र, त्याचा फटका हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. ही बाब ध्यानात आल्यानंतर सामाजिक कार्यात आघाडीवर असलेले बजाज ऑटोचे अधिकृत विक्रेते तथा हेरीटेज बजाजचे संचालक सुरेंद्र उपाध्याय यांनी सर्व रिक्षाचालकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे ठरविले आहे. शनिवारी सुमारे २४० रिक्षाचालकांना अन्नधान्याचा पुरवठा सुरेंद्र उपाध्याय यांनी केला. विशेष म्हणजे, या रिक्षाचालकांमध्ये अबोली रिक्षाच्या चालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. पाच किलो तांदूळ, पाच किलो गहू, यासह मसाले, डाळी आदी साहित्य उपाध्याय यांनी दिल्याने अनेक रिक्षाचालकांनी त्यांचे आभार मानले.

 568 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.