तीन पध्दतीच्या रुग्णालयांची विभागणी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
मुंबई : राज्यात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडून चार आठवडे पूर्ण झालेले आहेत. रोजचे कोरोनाग्रस्तांचे आकडे हे चिंताजनक असून या आजाराने आता गुणाकार पध्दतीने अर्थात तिसऱ्या टप्प्यात प्रवेश झाल्याचा इशारा देत दक्ष रहा, सतत मास्कचा वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत चीनच्या वुहान प्रांतातील सर्व निर्बध ७०-७६ दिवसानंतर उठविण्यात आले असून त्याधर्तीवर आपणही दक्ष राहीलो तर लवकरच याविरूध्दची लढाई आपण जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील नागरिकांना आणि खासकरून मुंबईकरांना इशारा देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधला. त्यावेळी ते बोलत होते.
कोणाला जर ताप, सर्दी, खोकला झाला असेल तर त्यांनी खाजगी डॉक्टरकडे दाखवू नका तर सरकारने सुरु केलेल्या फिव्हर क्लिनिक मध्ये आपली तब्येत दाखवा असे सांगत याबाबतची सर्व माहिती लवकरच आम्ही जाहीर करत आहोत. कोविड उपचारासाठी आम्ही रुग्णालयांची विभागणी केली आहे. ज्यांना सौम्य लक्षणे, मध्यम स्वरुपाची , तसेच कोरोना शिवाय इतर ही रोग असतील अशी तीन रुग्णालयांची विभागणी केली असेल. त्यात निष्णात डॉक्टर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय निवृत्त सैनिक, ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे . अनेक वोर्ड बॉय, निवृत्त परिचारिका, वैद्यकीय सहायता प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्ती ज्यांना सध्या काम मिळालेले नसेल त्यांना सहभागी करून घेणार असून ज्यांना या लढ्यात सरकारसोबत सहभागी व्हायचे आहे त्यांनी Covidyoddha@gmail.com या इमेलवर आपली माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व जण मास्क लावून बसलेले छायाचित्र आपण पाहिले असेलच. ही पहिली अशी व्हीडीओ कॉन्फरन्स होती. सर्व मंत्र्यांनी एकमेकांत अंतर पाळले होते, मात्र मानसिकदृष्ट्या आम्ही एक होतो आणि आहोत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एक टीम म्हणून त्यांनी बऱ्चयाच सुचना केल्या आहेत.
आपल्याकडे रुग्णांचे आकडे वाढताहेत ही वस्तुस्थिती आहे, चिंतेची बाब असली तर घाबरून जाऊ नका. आपण सर्व ताकदीनिशी प्रयत्न करीत आहोत. आपल्याकडे मला रुग्णांमध्ये थोडीशीही वाढ नको असे मी सांगितले आहे. कोरोना आपल्यामागे लागला आहे पण आपण ही सर्व जण कोरोनाच्या मागे “हात धुवून” लागलो आहोत.
लॉकडाऊन मुळे आपली गैरसोय होते आहे. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो पण हे युद्ध जिंकायचे असेल तर आपली घरे हेच गड किल्ले आहेत असे समजून घरातले वातावरण आनंदी ठेवा असे आवाहन त्यांनी केले.
माझे टीव्ही वाहिन्यांना देखील आवाहन आहे की कोरोनाच्या बातम्या तर आहेतच पण नागरिक तणावमुक्त राहतील आणि वातावरण हलकेफुलके राहील असे कार्यक्रम दाखवा असे आवाहन करत ज्यांना ज्यांना ह्रदयविकार, मधुमेह, स्थूलपणा आहे त्यांनी अधिक काळजी घ्या. बंधने ठेवा, कारण हे सर्व हाय रिस्क ग्रुप मध्ये आहेत्. घरी राहा पण तंदुरुस्त रहा, योगासने, हलके फुलके व्यायाम करा. कारण हे युद्ध आपण जिंकणारच आहोत पण पण यानंतरचे युद्ध घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेशी आहे. त्यासाठी आपली पूर्ण ताकद, हिम्मत लागणार असल्याची जाणीव करून देत अर्थव्यवस्था कोलमडून पडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
जगभरातल्या बातम्या येताहेत. अमेरिका जपान, सिंगापूर येथील आकडा वाढतोय. आपण जर असाच दक्षतेने सामना केला तर आपल्याकडे देखील ही परिस्थिती बदलेल. मला खात्री आहे, आपण निश्चित बाहेर पडणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मास्क, पीपीई किट्स चा तुटवडा जगभर आहे. आता आपल्या देशात महाराष्ट्र, गुजरात मध्ये व्व्हेंटिलेटर बनविणे सुरु आहे. पीपीई कीट सारख्या काही गोष्टी आपण बनवत आहोत. सर्व सुविधा वाढवतोय पण रोगाचे स्वरूप लक्षात घेता या सुविधा, उपकरणे प्रमाणित असणे गरजेचे आहे हे लक्षात घ्यावे. आपण जर घराबाहेर वस्तूंसाठी घराबाहेर पडणार असणार तेव्हा पुढचे काही दिवस मास्क वापरले पाहिजेत. त्यात गैर काहीच नाही. घरातल्या स्वच्छ कापडाने चेहरा कव्हर करता येऊ शकतो. पण छत्रीसारखा तो घरातल्या सर्व सदस्यांनी एकच वापरायचा नाही. वापरलेले मास्क कचऱ्यात तसेच फेकून न टाकता काळजीपूर्वक आणि सुरक्षित जागा पाहून जाळून टाका अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
722 total views, 1 views today