राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बदलापूर : कोरोनाशी लढा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने १४ एप्रिल पर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. यामुळे रिक्षा मालक आणि चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा सर्व रिक्षा मालक आणि चालकांना किमान मासिक रकम मदत जाहीर करावी. त्याच प्रमाणे त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
रिक्षा मालक आणि चालक यांचे रिक्षा व्यवसायावर कुटुंब अवलंबुन असते. रिक्षाचा व्यवसाय झाला तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च निघत असतो. बहुतेक रिक्षा मालक आणि चालक हे बँक किंवा अन्य वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज घेऊन रिक्षा चालवत असतात. त्यामुळे घर खर्च बरोबरच अशा रिक्षा चालकांना कर्जाचा हप्ता आणि व्याजही भरावे लागते. आज संपूर्ण देशामध्ये कोरोनाशी लढा देण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. हि संचार बंदी लागू होण्या एक दोन दिवस आधी अनेक शहरात स्वतःहून रिक्षा चालक बंद मध्ये सहभागी झाले होते. देशावर संकट आले असताना रिक्षा मालक आणि चालक कोणतीही तक्रार न करता स्वतःहून पुढे येत असतात.
संचार बंदी लागू झाल्यावर खाजगी आणि सरकारी नोकरदारांना भर पगारी रजा मिळणार आहे. त्यांना पूर्ण पगार देण्यात यावेत कोणाचेही पगार कापण्यात येऊ नये असे आदेश शासनाने दिले असल्याचे कालिदास देशमुख यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. परंतु रोजंदारी कामगारांप्रमाणे काम करणाऱ्या या रिक्षा चालकांना कोणतीही रकम शासनाकडून मिळत नाही. रिक्षा चालकांची बाजू लक्षात घेता त्यांना किमान मासिक रक्कम जाहीर करण्यात यावे. त्याच प्रमाणे रिक्षा चालकांचा किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्यांचा राज्याच्या आरोग्य योजनेत समावेश करण्यात येऊन मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनाही पाठवण्यात आली आहे.
708 total views, 1 views today