जनता कर्फ्यूच्या काळात ३ हजार ७०० ट्रेन बंद राहणार

रेल्वेने काढले परिपत्रक, उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्यांची संख्याही कमी करणार

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचं आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी या कालावधीत जनतेने घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं होतं. आता यासोबतच रेल्वेनंही २२ मार्च रोजी पूर्ण दिवस देशात ३ हजार ७०० ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेनं यासंबंधी परिपत्रकही काढलं आहे. तसंच मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबाद येथील उपनगरीय रेल्वेच्याही किमान फेऱ्याच सोडण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

२१ व २२ मार्च मध्यरात्री १२ वाजल्यापासून २२ मार्च रोजी रात्री १० वाजेपर्यंत ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २२ तास एकही ट्रेन चालवण्यात येणार नाही. परंतु सात तासांपेक्षा अधिक कालावधी प्रवास सुरू असलेल्या प्रवासी ट्रेनसाठी रेल्वेनं दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा ट्रेन आपल्या निर्धारित स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहेत.

रेल्वे मंत्रालयानं काढलेल्या परिपत्रकानुसार २२ मार्च रोजी २२ तासांसाठी कोणतीही ट्रेन आपल्या सुरूवातीच्या स्थानकापासून रवाना होणार नाही. दरम्यान, मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनचं परिचालन रविवारी सकाळी ४ वाजता थांबवण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. सकाळी ४ वाजण्यापूर्वी रवाना झालेल्या गाड्यांना आपल्या अंतिम स्थानकापर्यंत पोहोचण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोणत्या ट्रेन रद्द होतील यासंदर्भातील अधिक माहिती आज देण्यात येणार आहे.

 755 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.