पाच ते सोळा वयोगटातील २५ मुलांनी सादर केल्या कविता
ठाणे : जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कट्टी बट्टी हा पाठयपुस्तकातील कवितांवर आधारित रंगमंचीय अविष्कार विद्या विकास मंडळ, अंधेरी पश्चिम येथे संपन्न झाला.पाच ते सोळा वयोगटातील २५ मुलांनी कविता म्हटल्या, वाद्यमेळ साधून कविता गायल्या,काही कवितांवर नृत्याविष्कार सादर केले. सुरेल संस्मरणीय अशा कवितांचा सांगितिक नजराणा सादर करून या मुलांनी सर्व उपस्थितांची मने जिंकली
मुलांवर मराठी भाषेचे संस्कार व्हायला हवेत त्यामुळे मराठी भाषा जोपासली जाईल हा धागा पकडून प्रा.मंदार टिल्लू ,विद्या विकास मंडळ विद्यालयाचा माजी विद्यार्थी वैभव पटवर्धन आणि त्यांचे गंधार मधील सर्व सहकारी अनेक शाळांपर्यंत पोहोचून पाठयपुस्तकातील कविता आणि त्यातील सौंदर्याची रूजणूक मुलांमध्ये करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कट्टी बट्टी या कार्यक्रमाबरोबरच शाळेमध्ये जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त झालेल्या काव्यवाचन, अभिवाचन आणि एकपात्री अभिनय स्पर्धांचा स्व.मोहन कांदळगावकर सर पारितोषिक वितरण सोहळा देखील यावेळी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी,पालक आणि अंधेरीतील अनेक प्रतिष्ठीत उपस्थित होते.
482 total views, 1 views today