सुभाष पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा धडाका
बदलापूर : ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांनी हातात हात घालून चांगल्या योजना हाती घेतल्या आणि त्याला सर्व ग्रामस्थांचे सक्रिय सहकार्य लाभल्यावर गावाचा कसा चांगला विकास होऊ शकतो याचा आदर्श पॅटर्न म्हणजे जांभूळ गाव होय. त्यात सुभाष पिसाळ यांच्या सारख्या विकासाची दृष्टी ठेवून कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभल्यावर गावात चांगला इतिहास घडू शकतो हे आजच्या या विकास कामाच्या धडाक्याने सिद्ध केले आहे, असे गौरवोद्गार आमदार किसन कथोरे यांनी काढले.
कल्याण तालुक्यातील जांभूळ गावात आमदार विकास निधीमधून बसविण्यात आलेल्या चार हायमस्टचे उदघाटन, १४ व्या वित्त योजने अंतर्गत आदिवासी समाजासाठी उभारण्यात आलेल्या मंगल कार्यालयाचे उदघाटन, जिल्हा क्रीडा विभागांतर्गत कबड्डीपटूंसाठी जिल्ह्यातील पहिले मॅट क्रीडांगण, ग्रामपंचायत ग्राम निधीमधून आगरी, बौद्ध, आदिवासी मराठा आदी समाजबांधवांसाठी भांडी व साहित्य वाटप असे विवीध कार्यक्रम आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्यावेळी मार्गदर्शन करताना आमदार किसन कथोरे यांनी वरील गौरवोद्गार काढले.
जांभुळचे सरपंच नरेश गायकवाड यांनी स्वागत, उपसरपंच परीक्षित पिसाळ यांनी प्रास्तविक तर शिक्षक गिरीश ठाकरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. माजी सरपंच अर्चना राणे, ग्रामसेवक बाळू कोकणे, पोलीस पाटील दत्ता सावंत, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष भगवान पिसाळ, चंद्रकांत पिसाळ, काशिनाथ आयरेकर, लक्ष्मणबुवा जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जांभूळ गावात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आणि आमदार भाजपचे आहेत असे असूनही आमदार किसन कथोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विकास कामात एकत्र असल्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत होते.
जांभूळ गावाचं सॅटेलाईट मार्फत सर्वे करून घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते झाल्यावर गावातील प्रत्येक ग्रामस्थांना अद्ययावत मोजणी झालेले प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल. त्यामुळे भविष्यात या गावात जमिनीच्या हद्दीवरून भांडणे होण्याचा प्रश्नच उध्दभवणार नाही असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला. भविष्यात पाण्यावरून भांडणे होण्याची शक्यता लक्षात घेऊन जांभूळ गावात पंतप्रधान जलजीवन मिशन अंतर्गत जलकुंभ उभारण्यात येईल अशी घोषणाही आमदार किसन कथोरे यांनी यावेळी केली. जांभुळ गावाचा समावेश अंबरनाथ तालुक्यात लवकरच होईल मात्र पालिकेत त्याचा समावेश न होता भविष्यात महापालिका होईल त्यावेळी मात्र जांभुळचा समावेश महापालिकेत होईल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला.
जांभूळ गावाला कबड्डीपटूंचा फार मोठा इतिहास आहे. तसाच इतिहास घडला आहे. ठाणे जिल्ह्यातील कबड्डीचे पहिले मॅट चे क्रीडांगण जांभूळ गावाला मिळाले असल्याचे आमदार किसन कथोरे यांनीं सांगितले.
सरकार बदलले तरी माणसं बदलू नये असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ आपल्या भाषणात म्हणाले, नवी दिल्ली येथे शक्तिमान भाजपचा दारुण पराभव अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तो विजय केजरीवाल या व्यक्तीचा नसून त्यांनी केलेल्या विकास कामांचा आहे, त्याच प्रमाणे आमदार किसन कथोरे हे चार वेळा निवडून आले ते सुद्धा त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन मतदार संघाचा सर्वांगीण विकास काम केल्यानेच असे सुभाष पिसाळ म्हणाले. जांभूळ गाव हे विकासाच्या धाग्याने एकत्र बांधले गेले आहे. या विकास कामांमुळेच जांभूळ गावात एकोपा, शांती, सुबत्ता नांदते आहे असेही पिसाळ म्हणाले. सप्टेंबर महिन्यात किसन कथोरे यांच्या हस्ते ज्या मंगल कार्यालयाचे भूमिपूजन झाले त्याच मंगल कार्यालयाचे अवघ्या सहा महिन्यात त्याच्याच हस्ते उदघाटन होत आहे हा सुवर्ण योग असल्याचे सुभाष पिसाळ यांनी सांगितले. अन्यथा अनेक ठिकाणी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर भूमिपूजन केले जाते मात्र प्रत्यक्षात ते काम अपूर्णावस्थेतच रहाते असे पिसाळ म्हणाले.
438 total views, 1 views today