शब्दांची जागा बदलली कि अर्थ बदलतो

प्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर यांनी सांगितली शब्दांची महती

बदलापूर : शब्दांची जागा योग्यच असायला हवी. शब्दांची जागा बदलली कि अर्थ बदलतो असे प्रसिद्ध निवेदिका सौ. दीपाली केळकर यांनी सांगितले. शब्दांचे प्रकार, शब्दांची महती, त्यांचे वैशिष्ट्य, त्यांच्यावर जोर दिल्याने हाणारे बदल, शब्दांची मांडणी, त्यांचे स्वभाव, शब्दांचे स्थान, त्यामुळे वाक्यात होणारे बदल अशा अनेक शब्दांच्या बाबींवर प्रकाश टाकत प्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर यांनी शब्दांचे गाव उलगडले.
आमदार किसन कथोरे मित्र मंडळ, नगरसेवक संभाजी शिंदे आणि साहित्य यात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर उड्डाणपुलाखाली आयोजित पुस्तक प्रदर्शनात “शब्दांचा गावा जावे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर यांनी यावेळी शब्दांचे गाव उपस्थितांसमोर उलगडले. शब्दांचे महत्त्व साधु संतांनी, लेखकांनी आपल्या साहित्यात विशद करून ठेवले आहे. शब्दांची महती संतांनी जाणली होती, असे यावेळी केळकर म्हणाल्या.

शब्दांनाही असतो मान आणि व्यक्तिमत्व
शब्दांचा उगम, प्रवास, त्याचे महाकाव्यातील रूपांतर अशी शब्दांची महती त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर आगळ्यावेगळ्या पद्धतीने मांडली. प्रत्येक शब्दाला एक मान असतो, त्यांचे व्यक्तिमत्व असते. तसेच शब्दांच्या वापरावरून व्यक्तीचेही व्यक्तीमत्व कसे असेल याचा अंदाज येतो असेही दीपाली केळकर यांनी अनेक उदाहरणांतून स्पष्ट केले. वेदना, भीती, स्तुती, कौतुक, सुंदर, भारदस्तपणा, तुच्छता अशा अनेक भावना व्यक्त करणारे शब्द असतात. प्रत्येक शब्दाला विविध अर्थ असतात. प्रसंगानुरूप त्याचे अर्थ जसे बदलतात तसेच शब्दांचा वापर करत असताना आपला आवाजाचा बाज, त्यांवर दिलेला जोर हा त्या शब्दांचा आणि वाक्याचा भाव बदलत असतात असेही दीपाली केळकर यांनी यावेळी उदाहरणांसह दाखवून दिले.

प्रेक्षकांना केले बोलते
प्रत्येक शब्दाचा अर्थ व्यक्तीपरत्वे बदलत असतो. प्रत्येक शब्दाविषयी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी भावना, विचार असू शकतो हे सांगतांना त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधून त्यांच्याकडूनच त्यांच्या भावना विचारल्या. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात रंगलेल्या या कार्यक्रमात दीपाली केळकर यांनी प्रेक्षकांना म्हणी, चारोळ्या, वाक्यप्रचार, प्रचलित शब्द, त्यांच्या संकल्पना यावर बोलते केले. शब्दांचे स्थान त्याचा अर्थ बदलवतात हे सांगतांना त्यांनी माध्यमातींल बातम्यांचा आधार घेत उलगडून सांगितले. निवेदक नितीन केळकर यांच्या “शब्द हवे ” हि कविता सादर करून दीपाली केळकर यांनी आपल्या कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमाला बदलापुरकरांनी चांगली उपस्थिती लावली होती. यावेळी डॉ. शकुंतला चुरी, कविता खैरनार, चित्रकार सचिन जुवाटकर, लेखक अनिल पालये आदी मराठी भाषेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव स्थानिक नगरसेवक संभाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहरातील नामवंत व्यक्ती, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लेखक तात्या सोनावणे यांनी सूत्रसंचालन केले.

 684 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.