श्री आनंद भारती समाजाच्या ११३ व्या गणेशोत्सवात ७२ व्या नाखवा स्मारक वार्षिक शैक्षणिक समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शैलेंद्र खांडेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला सल्ला.
ठाणे : श्री आनंद भारती समाजाने ११३ वर्षांची गणेशभक्ती जोपासत ७२ वर्षांपूर्वी या गणेशभक्तीला श्री सरस्वती भक्तीची जोड दिली. यशदायी व्यासपीठावरून आज सुमारे पाऊणशे गौरवमूर्तींचा सत्कार मला भावला. या तरुणाईला मी स्वानुभवावरून सांगेल की, भविष्याचा वेध घेताना क्रीया-प्रतिक्रिया ( कॉज अँड इफेक्ट), प्रलोभनाशी फारकत आणि मोठया स्वप्नपूर्तीचे डोळस वेड या त्रिसूत्रीचा अथक पाठपुरावा करा.ध्येयसक्तीचा हा वेडेपणाच तुमच्या धवल यशाची गुरुकिल्ली ठरेल, असे मनोगत ठाणे जनता बँकेचे संचालक शैलेंद्र खांडेकर यांनी व्यक्त केले.
श्री आनंद भारती समाज सभागृहात रविवारी सायंकाळी संपन्न झालेल्या ७२ व्या नाखवा स्मारक वार्षिक शैक्षणिक समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून खांडेकर बोलत होते. समाजाध्यक्ष सुभाषचंद्र मोरेकर, कार्याध्यक्ष महेश कोळी, कार्यवाहक विवेक मोरेकर उपस्थित होते.
शालांत, दहावी परीक्षेत ९८ टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेल्या यश स्वारचा ७२ वे यशवंत लक्ष्मण नाखवा, याच परीक्षेत ९५.४० टक्के संपादन करणाऱ्या वृषभ शेलार याचा ७१ वे दगडू पांडू नाखवा स्मृती पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सिबीएससी, १० वी त ८५ टक्के गुण मिळवणाऱ्या जेष्ठा केणी हीचा संस्थेतर्फे प्रथम पारितोषिक विजेती म्हणून गौरव करण्यात आला.
भारताच्या यशस्वी चांद्रयान ३ मोहिमेत गोदरेजचा कुशल तंत्रज्ञ म्हणून सहभागी झालेला संस्थेचा सदस्य संजीव खराडे याचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला. चेतना वैती, सोनाली ठाणेकर, अलका कोळी यांनी परिचय करुन दिला.नुपूर कोळी हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
33,734 total views, 1 views today