मर्क स्पोर्ट्स क्लब पदार्पणालाच अंतिम फेरीत

संघ कठीण परिस्थितीत असताना वैभव जयकर आणि अभिषेक श्रीवास्तवने चौथ्या विकेटसाठी ७९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला.

ठाणे : मर्क स्पोर्ट्स क्लबने अरुप्रीत टायगर्स संघाचा सहा विकेट्सनी पराभव करत पदार्पणालाच ठाणेवैभव आणि स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित ३५ षटकांच्या ४७ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेतील ब गटाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. अरुप्रीत टायगर्स संघाला ९४ धावांवर गुंडाळल्यावर मर्क स्पोर्ट्स क्लबने २५.२ षटकात ४ बाद ९८ धावा करत निर्णायक फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या अरुप्रीत टायगर्स संघाला फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे धावांचे शतक पाहता आले नाही.अजेय सिंघमचे (५०) अर्धशतक, अभिषेक गुप्ता (१६) आणि ऋषिकेश पवारच्या १० धावांचा अपवाद वगळता त्यांच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. श्रेयस केसरकर आणि अभिषेक कनोजियाने प्रत्येकी ३ विकेट्स मिळवल्या. निमिष रेडकरने दोन फलंदाज बाद केले.
छोट्या लक्ष्याचा बचाव करताना अरुप्रीत टायगर्स संघाच्या गोलंदाजांनी अवघ्या १२ धावांत तीन झटके देत मर्क स्पोर्ट्स क्लबला अडचणीत आणले होते. संघ कठीण परिस्थितीत असताना वैभव जयकर आणि अभिषेक श्रीवास्तवने चौथ्या विकेटसाठी ७९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना ४५ धावांवर वैभव बाद झाला. अभिषेकने नाबाद ३९ धावा केल्या. शुभम वर्मा, अनिकेत परिहार, ऋषीकेश पवारने प्रत्येकी एक फलंदाज माघारी पाठवला.
संक्षिप्त धावफलक : अरुप्रीत टायगर्स : २०.४ षटकात सर्वबाद ९४ ( अजेय सिंघम ५०, अभिषेक गुप्ता १६, ऋषिकेश पवार १०, श्रेयस केसरकर ६.४-२-१९-३, अभिषेक कनोजिया ५-१-१९-३,निमिष रेडकर ३-१४-२) पराभूत विरुद्ध मर्क स्पोर्ट्स क्लब : २५.२ षटकात ४ बाद ९८ (वैभव जयकर ४५, अभिषेक श्रीवास्तव नाबाद ३९, शुभम वर्मा ५-१७-१ , ऋषिकेश पवार ५-१-१२-१ , अनिकेत परिहार १-३-१).

 16,280 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.