राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्याबद्दल आमदार निरंजन डावखरेंनी मानले राज्य सरकारचे आभार
ठाणे : राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर एमपीएससी'च्या नव्या अभ्यासक्रमानुसार वर्णनात्मक पद्धतीने होणाऱ्या परीक्षा पुढील वर्षाऐवजी २०२५ पासून घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
एमपीएससी’ने २०२३ पासून नव्या अभ्यासक्रमानुसार वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध केला जात होता. कोरोना संसर्गानंतर विद्यार्थ्यांची दोन वर्ष वाया गेली असताना, अचानक नव्या पद्धतीने परीक्षा देण्याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. तसेच जुन्या पद्धतीने परीक्षा घेण्याचा आग्रह धरला होता.
राज्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमदार निरंजन डावखरे यांनी पाठिंबा दिला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांची मागणी मंजूर करण्याची विनंती केली होती. त्याचबरोबर विधान परिषदेत लक्षवेधी सुचना मांडून २०२५ पासून नव्या पद्धतीने परीक्षा घेण्याचा आग्रह धरला होता. अखेर या मागणीला यश आले असून, राज्य सरकारने आज २०२५ पासून नव्या अभ्यासक्रमानुसार `एमपीएससी’च्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे सरकार संवेदनशील असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार हा निर्णय झाला, अशी प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.
328 total views, 1 views today