म्हाळगी व्याख्यानमालेत चाणक्य फेम पद्मश्री डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचे प्रतिपादन.
ठाणे : सामाजिक सक्रियता होईल, तेव्हाच अमृतकाल येईल ; किंबहुना, अमृतकाल आणण्यासाठी पुन्हा एकदा अमृतमंथन करावे लागेल.असे प्रतिपादन चाणक्य फेम अभिनेते पद्मश्री डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले. ठाण्यातील सरस्वती शाळेच्या मैदानात रविवारी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचा समारोप झाला.या व्याख्यानमालेतील अखेरचे पुष्प सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक अभिनेते डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते.
‘उज्वल इतिहास से अमृतकाल की ओर’ या विषयावर भाष्य करताना डॉ. द्विवेदी यांनी, रामायण, महाभारत ते भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, कौटील्य, बाणभट्ट यांच्या काळातील उज्वल इतिहास व संस्कृतीचे दाखले दिले. यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आ. संजय केळकर, सचिव शरद पुरोहीत तर, श्रोत्यांमध्ये प्रा. नरेंद्र पाठक, चित्रकार सदाशिव कुलकर्णी,प्रा.किर्ती आगाशे, सुहास जावडेकर आदी उपस्थित होते. आपल्या धीरगंभीर शैलीत श्रोत्यांना संबोधित करताना डॉ. द्विवेदी यांनी, अमृतमंथनातील दोन पक्ष असलेले सूर-असुर या संदर्भात परखड मिमांसा करून अमृतकालाचे वर्णन केले. रामराज्यातही गरीबी होती, पुराणकालातदेखील धर्मासाठी आरोळ्या ठोकल्या गेल्या, चाणक्य राजवटीत तर नगरात प्रवेश करण्यासाठी मुद्रा (पारपत्र) लागत असे. असे स्पष्ट करून मनुस्मृतीतील काही बाबीं दृगोचर करून त्यांनी काळे धन ही संज्ञा उलगडली. पुढे बोलताना, अमृतकाल व्यक्तींच्या श्रमातुन येत असतो, पण त्यासाठी मंथन होणे गरजेचे आहे. हे मंथन निरंतर सुरु ठेवण्याचा भारताचा प्रयत्न राहीला आहे. तसेच, सामाजिक सक्रियता होत नाही, जोपर्यत आपण ही जबाबदारी घेत नाही, तोपर्यत तरी अमृतकाल येणार नाही. असे स्पष्ट करीत आपले महापुरुष, महाजन ज्या मार्गाने चालले त्याच मार्गाने वाटचाल करणे गरजेचे असल्याचे सांगितले.तर, सद्यस्थितीत अनेक आव्हाने असली तरी पुढील २५ वर्षात आपल्याकडे अमृतकाल असेल,असे आपल्या पंतप्रधानांनीही नमुद केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.व्याख्यानमालेचा समारोप शिरस्त्याप्रमाणे वंदे मातरम् ने करण्यात आला.
सोशल मिडिया हा भस्मासुर
जेव्हा सोशल मिडिया आला तेव्हा, आपण, भस्मासुराला तर जन्म दिला नाही ना ? अशी शंका व्यक्त करून डॉ. द्विवेदी यांनी, दुसऱ्याला भस्म करता करता एक दिवस आपण स्वतःच यात भस्म होऊ.असा सूचक इशारा दिला. या सोशल मिडियामुळे लोंकामधे संवाद होईल असे वाटले होते, पण संवाद दूरच राहीला,मात्र एकप्रकारे शब्दांची हिंसाच सुरु असल्याची खंतही त्यांनी बोलुन दाखवली.
396 total views, 1 views today