९ जानेवारीपासून रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला

या व्याख्यानमालेचे यंदा ३७ वे वर्ष असून कोविड काळानंतर प्रथमच नौपाड्यातील सरस्वती मंदिर शाळेच्या पटांगणात होत आहे.

ठाणे : रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला यंदा ९ ते १५ जानेवारी दरम्यान होत आहे. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समितीने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचे यंदा ३७ वे वर्ष असून कोविड काळानंतर प्रथमच नौपाड्यातील सरस्वती मंदिर शाळेच्या पटांगणात होत आहे, अशी माहिती व्याख्यानमालेचे संस्थापक, अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील बल्लाळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महापालिकेचे माजी भाजप गटनेते मनोहर डुंबरे, माजी उपमहापौर सुभाष काळे, शरद पुरोहीत, माधुरी ताम्हाणे, डॉ.किर्ती आगाशे, सुहास जावडेकर आणि परिवहन सदस्य विकास पाटील आदी उपस्थित होते.
रामभाऊ म्हाळगी व्याख्यानामाला ठाणेकरांसाठी बौध्दिक मेजवानी असल्याने या व्याख्यानमालेची आवर्जून वाट पाहिली जाते. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून नौपाडा येथील सरस्वती शाळेच्या बंदिस्त सभागृहात पार पडली. यंदा मात्र खुल्या पटांगणात व्याख्यानमाला होत असून ९ ते १५ जानेवारीपर्यंत दररोज सायंकाळी ८.१५ वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे. सोमवारी ९ जानेवारी रोजी राजकिय विश्लेषक प्रा.संगीत रागी हे ‘आझादी का अमृतमहोत्सव’ यावर भाष्य करणार आहेत. त्यानंतर मंगळवार १० जानेवारी रोजी डायबेटीस अपाय आणि उपाय या विषयावर डॉ.तुषार रेगे श्रोत्यांना आरोग्यमंत्र देतील. बुधवारी ११ जानेवारी रोजी मिशन आयएएसचे संचालक प्रा.नरेशचंद्र काठोळे हे ‘आव्हान स्पर्धा परिक्षांचे, गुरुवारी १२ जानेवारीला सुप्रसिद्ध गायक, संगीतकार राहुल देशपांडे यांची प्रकट मुलाखत डॉ.किर्ती आगाशे घेतील. तर शुक्रवार १३ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश उदय लळीत संसदीय विशेषाधिकार आणि संसद अवमानना अधिकार यावर माहिती देतील. तर शनिवार १४ जानेवारी रोजी “दीपस्तंभ” आधार निराधारांचा या विषयावर यजुवेंद्र महाजन यांचे व्य़ाख्यान असेल. तर समारोपास रविवार १५ जानेवारी रोजी चाणक्य फेम अभिनेता, सिनेदिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी ‘उज्वल इतिहास से अमृतकाल की ओर’ यासंदर्भातील किस्से उलगडतील.
गेली ३६ वर्षे ही व्याख्यानमाला ठराविक दिवशी याच ठिकाणी आयोजित केली जात असून विशेष म्हणजे आतापर्यंत २४६ मान्यवरांनी या माध्यमातुन श्रोत्यांना मार्गदर्शन केले आहे. ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसुत्रीवर व्याख्यानमाला आधारलेली असून ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे ही व्याख्यानमाला महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व्याख्यानमाला म्हणून ओळखली जाते.असेही आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

 13,358 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.