अजित घोष स्मृती टी-२० क्रिकेट स्पर्धा
मुंबई : मुंबई पोलीस जिमखाना आणि स्पोर्ट्सफिल्ड या संघांनी साखळीतील सलग दुसऱया विजयाची नोंद करीत अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीमधील प्रवेश जवळजवळ निश्चित केला आहे. आज पोलीस जिमखान्याने पय्याडे स्पोर्ट्स क्लबचा केवळ ८ धावांनी पराभव केला तर स्पोर्ट्स फिल्डने दहिसर स्पोर्ट्स क्लबवर सात विकेट्सनी मात केली.
पोलीस संघाने प्रथम फलंदाजी करून १७ षटकांत ५ बाद १०९ धावा केल्या. सृष्टी नाईक (२१) आणि निधी बुळे (३३) यांनी चांगले योगदान दिले. मात्र पय्याडेला रोखण्याच्या कामात शेरील रोजारिओ (१०/२) आणि निधी बुळे (२१/२) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
यजमान स्पोर्टिंग युनियनला मात्र आज पराभव चाखावा लागला. विजय सी सीने त्यांना ९ धावांनी पराभूत केले. याचे श्रेय जाग्रवी पवार या अष्टपैलू खेळाडूला जाते. तिने नाबाद २३ धावा केल्यानंतर स्पोर्टिंगच्या दोन फलंदाजांना २० धावांत बाद केले. सिद्धेश्वरी पागधरे (३२) आणि सानिया राऊत (२५) यांच्यामुळे स्पोर्टिंगच्या आशा काही काळ अवश्य पल्लवीत झाल्या होत्या.
उद्या पय्याडेची स्पोर्टिंग क्लब ठाणेशी ‘अ’ गटात गाठ पडणार असून त्यांना या दुर्बल संघावर मात करून उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. गट ‘ब’मध्ये विजय क्लबला दहिसरवर मात करण्याची संधी आहे. स्पोर्टिंगला स्पोर्ट्स फिल्डवर मात करणे तसे अवघड जाईल.
157 total views, 1 views today