सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम
ठाणे : सामाजिक न्याय विभागाला ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज ऐरोली येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा जातपडताळणी समितीच्यावतीने जात प्रमाणपत्राचे तसेच दिव्यांगांना दिव्यांग पत्रिकेचे वाटप करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,ठाणे. जिल्हा जात पडताळणी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोली येथील दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, ठाण्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे, रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या प्रमुख संध्या अंबादी, ग्लोबल फाऊंडेंशनचे संचालक योगा नांबियार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत समाज कल्याण विभागाने राबविलेल्या लोकोपयोगी उपक्रमाचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. तसेच विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजना व स्टॅन्ड अप इंडिया योजनेच्या लाभार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
सहायक आयुक्त इंगळे म्हणाले की, समाज कल्याण विभागाची स्थापना १५ ऑक्टोंबर १९३२ रोजी झाली असून या स्थापनेला आज ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. समाज कल्याण विभाग मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात कसे आणता येईल यासाठी कार्यरत असतो. शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचविण्यासाठी या विभागाचे अधिकारी व कर्मचारी सतत प्रयत्नशील आहेत. मागास समाजासाठी अनेक उपक्रम व विकास योजना राबविण्याचे काम विभाग करत आहे. चाबुकस्वार म्हणाले की, नवी मुंबई महानगरपालिकेकडून अनेक योजना मागासवर्गीय घटकांसाठी राबविण्यात येत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांनी यांच लाभ घ्यावा.
33,650 total views, 1 views today